आळंदी : प्रसाद बोराटे (Pclive7.com):-
चालला गजर जाहलो अधीर,
लागली नजर कळसाला,
पंचप्राण हे तल्लीन,
आता पाहीन पांडुरंगाला,
पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी कैवल्याचा पुतळा ज्ञानेश्वर माऊलींना घेऊन जाण्यासाठी राज्यभरासह कर्नाटक तसेच आंध्रप्रदेशातून हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे ज्येष्ठ वद्य अष्टमी मंगळवार दि.२१ रोजी दुपारी चार वाजता प्रस्थान होत आहे.
या प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, प्रस्थानादरम्यान कळस हालतो, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने हजारो भाविकांची नजर कळसाकडे असणार आहे. मंगळवारी पहाटे चार ते साडे पाचच्या दरम्यान घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृतपूजा व दुधारती झाली आहे. त्यानंतर श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापुजा होतील. सकाळी सहा ते दुपारी बारा पर्यंत भाविकांसाठी श्रींचे समाधी स्पर्शदर्शन सुरू असेल. तसेच नऊ ते अकरा या वेळेत विना मंडपात कीर्तन सेवा होईल. दुपारी बारा ते साडे बारा पर्यंत ‘श्रीं’ ना नैवेद्य व भाविकांना दर्शन बंद करण्यात येईल. त्यांनतर भाविकांना समाधीचे स्पर्शदर्शन सुरू होईल. दुपारी दोन नंतर प्रस्थान कार्यक्रमासाठी देऊळवाडा स्वच्छ करण्यात येईल. दुपारी तीनच्या दरम्यान प्रस्थान सोहळ्यातील मानाच्या ४७ दिंड्याना मंदिरात प्रवेश दिले जाणार आहे.
दरम्यान माऊलींना पोशाख वाढविण्यात येईल. दुपारी चार नंतर पालखी प्रस्थानासाठी श्रीगुरू हैबतबाबा यांचे वतीने परंपरागत मानाची आरती होईल त्यांनतर संस्थानची आरती होईल व प्रमुख मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप होईल. त्यांनतर विना मंडपात ठेवलेल्या पालखीत श्रींच्या चलपादुका ठेवण्यात येतील. संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना मानाचे पागोटे वाटप केले जाईल. त्यांनतर श्रीगुरू हैबतरावबाबां तर्फे दिंडीप्रमुख, प्रतिष्ठित मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात येईल. तसेच श्रींच्या समाधी जवळ संस्थानतर्फे नारळ देण्यात येईल.
आळंदीकर खांदेकरी माऊलींची पालखी विना मंडपाबाहेर आणून मंदिर प्रदक्षिणा करून देऊळवाड्यातून बाहेर आणली जाईल, मंदिर प्रदक्षिणा करत खांदेकरी पालखी ज्ञानोबा माऊली असा जयघोष करत महाद्वारातून बाहेर आणतील. त्यानंतर नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर समाजआरती होऊन पालखी नवीन दर्शनबारी मंडपात (गांधीवाडा) येथे विसावेल. बुधवारी दिं २२ रोजी पहाटे पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पास धारकांशिवाय इतरांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
इंद्रायणी नदी परिसर,माऊली मंदिर व आळंदी शहरात सर्व भागात हरीनामाच्या गजराला उधाण आले असल्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण आहे.