आळंदी : प्रसाद बोराटे :
(Pclive7.com):-
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: |
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ||
आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीत या दिवशी शिष्य आपल्या ग्रुरू प्रतीची कृतज्ञता व्यक्त करतात. गुरु – शिष्य यांच्या पवित्र उत्सवानिमित्त आळंदीतील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतील परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. लक्ष्मण आसबे (अध्यक्ष – कामधेनू परिवार इंदापूर), मंचक इप्पर साहेब (पोलीस उपायुक्त – पिंपरी चिंचवड), निर्मलाताई जागडे (संचालिका – पुणे जिल्हा मध्य. सह. बँक लि. पुणे) समवेत संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, सदस्य अनिल वडगावकर, विद्यालयाचे उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, शिक्षक प्रतिनिधी नारायण पिंगळे, शिक्षकेतर प्रतिनिधी सोमनाथ आल्हाट, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संतश्रेष्ठ गुरुमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयातील दिव्यांग विभागातील दिव्यांग विद्यार्थिनींच्या सुमधुर आवाजातील स्वागत गीताने स्वागत करून झाली.
गुरुपौर्णिमा निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत गुरूंचे पूजन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. व त्यानंतर विद्यालयातील इयत्ता दहावी बारावी इतर परीक्षांमध्ये प्रथम तीन विद्यार्थ्यांना तसेच विषयांमध्ये प्रथम अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय करून देत प्रशालेतील शिक्षणाचा दर्जा, प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा, राबविले जाणारे उपक्रम, निकालाची व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाची परंपरा या विषयी माहिती देत यशस्वी व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर साहेब यांनी सर्वप्रथम गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे कौतुक करत संस्थेतील विविध विभागात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे व संस्थेच्या सर्व घटकांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थी जीवनात जीवनातील ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी ध्येय वेडे होणे गरजेचे आहे. तसेच वेळेचे – कामाचे नियोजन करणे व त्यासाठी शरीर स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी व्यायामाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थी जीवनातील स्वप्न साकार करण्यासाठी गुरुची भूमिका व स्थान याची सांगड घालत स्वतःच्या जीवनातील गुरूंच्या कृपाशीर्वादामुळे सामान्य विद्यार्थी ते यूपीएससी च्या माध्यमातून पोलीस उपायुक्त पर्यंतचा प्रेरक असा जीवन प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला व बुद्धी ही कोणाची मालमत्ता नाही हिच्या बळावर आपण आपल्या मनातील स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करावा असा संदेश दिला.
तसेच ह.भ.प. डॉ. लक्ष्मण आसबे यांनी सर्वप्रथम संस्कारक्षम शाळा उभी करण्यासाठी 1954 पासून कार्यरत असलेल्या वडगावकर परिवाराने या संस्थेचा वेलू गगनापर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या कष्टाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. तदनंतर गुरु व सद्गुरु यातील फरक स्पष्ट करत गुरु एक व्यक्ती नसून शक्ती आहे आणि त्या शक्तीचा आपण सर्वांनी आपले जीवन समृद्ध करण्याकरिता वापर करावा. त्यासाठी डोळ्यासमोर समृद्ध अशा कोणाचे तरी आदर्श असावे लागते असेही सांगितले. लक्ष्मण आसबे यांनी आपल्या जीवनातील स्व अनुभवाच्या माध्यमातून खडतर व दारिद्र्याने पीडित अशा परिस्थितीवर कशाप्रकारे मात केली याचे हृदय द्रावक, अंगावर शहारे येतील असा जीवन प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला हे ऐकून स्वतः समवेत उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, निर्मलाताई जागडे यांनी यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रदीप काळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक समिती, शिस्त समिती, संगणक समिती यांनी मोलाचे सहकार्य केले.