मुंबई (Pclive7.com):- वेदान्त समूह आणि फॉक्सकॉनच्या भागीदारीतून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार रुपयांची गुंतवणूक होणार होती. पण, आता या गुंतवणूकीसाठी गुजरातची निवड केल्याचं वेदान्त समूहाने जाहीर केलं आहे. त्यामुळे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार आणि कोट्यावधी रुपयांच्या महसूलाला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडवणीस सरकारवर निशाणा साधला आहे.
देशात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून २ लाख कोटींची गुंतवणूक आणि २ लाख रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं की, तुमचे केंद्र सरकारसह चांगले संबंध आहे. तुमच्या कार्यकाळात हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वेदान्त प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले. वेदान्तने कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्राला निवडलं होते. मात्र, आता गुजरातचे नाव समोर येत आहे. महाराष्ट्रात येणारा प्रकल्प दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल, तर कदापी खपवून घेतलं जाणार नाही,” असा इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
विरोधक सत्ताधाऱ्यांनी राजकारण…
मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा हा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावे. हा प्रकल्प राज्यातून जात असेल, तर गाजर दाखवण्याचं काम केलं जात आहे. रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे, असं विचारलं असता अजित पवार यांनी म्हटलं, तोही प्रकल्प राज्यात व्हावा. ज्यामाध्यमातून राज्याला रोजगार, गुंतवणूक, देशाला आणि राज्याला जीएसटी मिळेल, असे प्रकल्प आले पाहिजे. हे प्रकल्प येताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी राजकारण करू नये, असेही पवार यांनी ठणकावलं आहे.