पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव परिसरात महापालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली कामे अद्यापही अर्धवट अवस्थेत आहेत. यातून पिंपळे गुरवची स्मशानभूमीही दुरावस्थेपासून सुटलेली नाही. बंद अवस्थेतील स्वच्छतागृह, उघड्या चेंबरमधून रस्त्यावर येत असलेले दुर्गंधीयुक्त पाणी, जाण्या-येण्याच्या मार्गावर दगड मातीचे ढीग अशा विविध समस्यांमुळे पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीला बकालपणा आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर कार्याध्यक्ष शाम जगताप व शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून, स्मशानभूमीच्या समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

मृत्यू कुणालाही चुकत नाही. हे शाश्वत सत्य असून, जन्माला आलेल्या प्रत्येकालाच मृत्यूला सामोरे जावे लागते. मनुष्याच्या जीवनातील सर्वात शेवटचा सोपस्कर म्हणजे अंत्यसंस्कार. मनुष्याचा शेवट चांगला व्हावा, अशीच धारणा प्रत्येकाची असते. तर मृत्यूमुखी पडलेल्या इसमावर स्वच्छ ठिकाणी अंत्यसंस्कार व्हावेत, यासाठी जवळच्या नातेवाईकांची धडपड असते. मात्र, पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीच्या बकाल अवस्थेमुळे मृत्यूनंतरही यातना साथ सोडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने स्मशानभूमीची योग्य देखभाल, दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पिंपळे गुरवमध्ये महापालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेली कामे बऱ्याच महिन्यापासून अर्धवट अवस्थेत आहेत. काही नगरामधील कामे पूर्ण झालेली आहेत. मात्र, स्मशान भूमीतील स्वच्छतागृह बंद आहे. पदपथाची कामे अपूर्ण आहेत. जाण्या-येण्याच्या मार्गावर दगड व मातीचे ढीग आहेत. विद्युत डीपी उघडे आहेत. त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच चेंबरचे झाकण उघडे असल्याने चेंबरमधील पाणी रस्त्यावर पसरले असून, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. कचरा सर्वत्र रस्त्यावर पडलेला आहे, याचा त्रास अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.
स्मशानभूमी संदर्भात पिंपळे गुरवमधील नागरिकांच्या तक्रारी वारंवार येत आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी इथली कामे लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. आता महापालिका आयुक्तांनीच या समस्यांकडे लक्ष द्यावे.
– शाम जगताप, माजी शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस






















Join Our Whatsapp Group