– बाळासाहेब जवळकर –
पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी…
पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार म्हणता येईल, असे दापोडीलगतचे छोटेसे गाव….
कुस्ती, कबड्डीच्या मात्तबर खेळाडूंचे गाव….
गणेशोत्सवातील सजावट स्पर्धांमध्ये हमखास बक्षीसे मिळवणाऱ्या सार्वजनिक मंडळांचे गाव…..
प्रसिध्द ‘हॉटेल अशोक’चा लज्जतदार चहा मिळणारे गाव….
राजकारणात, समाजकारणात पंचक्रोशीत ख्याती होती, अशा ‘रंगादादांचे’ गाव….
पांडुरंगांच्या अपार श्रध्देपोटी लोकवर्गणीतून विठ्ठल-रखूमाई मंदिराची उभारणी करणाऱ्या भाविकांचे उत्सवशील, उपक्रमशील गाव….

सर्व स्तरातील, जाती-धर्मातील रहिवाशांचे वास्तव असणारे, शहरीकरणाच्या वाटेवर असूनही गावपण जपणारे फुगेवाडी हे गाव, भलत्याच कारणासाठी प्रकाशझोतात आले. जवळपास १७ जणांचा जीव घेणारे विषारी दारूकांड घडले, ते याच फुगेवाडी गावात. त्यामुळे गावची मूळची ओळख बाजूला गेली आणि दारूकांड झालेले गाव, अशी नकारात्मक आणि अन्यायकारक प्रतिमा तयार झाली. फुगेवाडीसह पिंपरी-चिंचवडची बदनामी झालेले हे प्रकरण २८ व २९ मे २०२६ रोजी उघडकीस आले. एकापाठोपाठ १७ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. दारूचे प्रमाण वाढवण्यासाठी, जास्त नशा होण्यासाठी दारूत मिथेनॉल हे अत्यंत विषारी रसायन मिसळण्यात आले. त्या भेसळयुक्त दारूमुळे हे भयावह दारूकांड घडले.
मृतांमध्ये बहुतांश रोजंदारी कामगार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गोरगरीबांचा समावेश होता. मृत्यूचा खरा आकडा १७ पेक्षा कितीतरी अधिक असावा, असा संशय व्यक्त केला जातो.
जवळपास ४० वर्षांपासून हा दारूचा धंदा गावच्या कोपऱ्यात व्यवस्थित सुरू होता. सगळ्यांना सगळे काही माहिती होते. तरीही त्याकडे सोयीस्कर डोळेझाक केली जात होती. हजारो तळीरामांनी त्या दारूची झिंग अनुभवली असेल. तेव्हा दारूधंद्याचा कधी बोभाटा झाला नाही. मात्र, मृत्यूचे तांडव सुरू झाल्यानंतरच सर्वांना खडबडून जाग आली. फुगेवाडीचे निमित्त झाले. राज्यभरात ठिकठिकाणी असलेल्या गावठी दारूचे अर्थकारण पुन्हा चर्चेत आले. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची हप्तेखोरी नव्याने अधोरेखित झाली. यापूर्वी विषारी दारूमुळे अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यातून पुढे काही होत नाही. ठरावीक काळानंतर परिस्थिती पूर्ववत होते, जणू काही घडलेच नव्हते, असा पूर्वानुभव सांगण्यात येतो. हे खरे असल्यास, फुगेवाडीची घटना अशीच विस्मरणात जाईल आणि भविष्यात एखाद्या नवीन ठिकाणी फुगेवाडीची पुनरावृत्ती होईल, हे कटू वास्तव नाकारता येणार नाही.

दौरे, आश्वासने आणि चमकोगिरी…
दारूकांड झाल्यानंतर सगळ्यांनी फुगेवाडीत धाव घेतली. ‘पीपली लाईव्ह’ सिनेमाची आठवण येईल, अशा पध्दतीने फुगेवाडीत हवसे, नवशे, गवशे यांची गर्दी उसळली. ज्यांनी आयुष्यात कधी गावात पाय ठेवला नाही, त्यांचे ताफे गावात दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासनातले अधिकारी, राजकारण्यांची रांग लागली. पत्रकार ठाण मांडूनच बसले. पाहणी दौरे झाले, सांत्वन भेटी झाल्या. प्रसारमाध्यमांना मुलाखती देत वेगवेगळी आश्वासने, मदतीच्या घोषणा झाल्या. काहींनी चमकोगिरी करून घेतली. आता प्रकरण शांत झाले. तर, ज्याने-त्याने आपापली वाट धरली. यातील कोणाला पुन्हा फुगेवाडीची आठवण येईलच, याची खात्री देता येणार नाही.
फुगेवाडीच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्षच
१४ हजार लोकसंख्येचे हे गाव समस्यांचे माहेरघर आहे. अशी कोणतीही समस्या नसेल की, ज्याचा फुगेवाडीकरांना सामना करावा लागत नाही. ‘स्मार्ट सिटी’ म्हणवणाऱ्या पिंपरी-चिंचवडसारख्या विकसित शहरात खरोखरच फुगेवाडी आहे का? असा प्रश्न गावात फेरफटका मारल्यानंतर पडू शकतो. मात्र, येथील समस्यांची साधी दखलही घेतली जात नाही.
पुणे-मुंबई महामार्गावर असलेली आधीची दिमाखदार फुगेवाडी आता राहिली नाही. रस्तारूंदीकरण आणि विकासकामांच्या नावाखाली फुगेवाडीची लचकेतोड करण्यात आली. त्यामुळे महामार्गावर असूनही गावचे अस्तित्व दिसून येत नाही. गावातील कित्येक कुटुंबांनी पिंपळे गुरवला स्थलांतर केले. फुगेवाडीला गावठाण दर्जा मिळावा, अशी जुनी मागणी आहे. जेणेकरून घरांचे नियमतीकरण होईल, इतर बाबतीतही दिलासा मिळेल.
अरूंद रस्त्यामुळे अडचणी..
१९९५ च्या विकास आराखड्यातील फुगेवाडीतील प्रमुख रस्ते अजूनही आकाराला आले नाही. मुख्य रस्त्यांचा विकास झाला नाही. अरूंद रस्ते ही डोकेदुखी ठरते आहे. अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. अशा रस्त्यांची कित्येक महिने साधी डागडुजी होत नाही. अपुऱ्या रस्त्यांमुळे मोठी वाहने फुगेवाडीत आणता येत नाहीत. अग्नीबंब किंवा रूग्णवाहिका आत येऊ शकत नाही.
जेव्हा-जेव्हा रस्तारूंदीकरण झाले, तेव्हा फुगेवाडीतील मिळकती मोठ्या प्रमाणात पाडण्यात आल्या. त्यानंतरही वेगवेगळी कारणे पुढे करून महापालिकेने रस्ते मोठे केले. त्याचा फायदा मूळ फुगेवाडीकरांना झालाच नाही. रूंदीकरणामुळे उपलब्ध झालेल्या जागांवर अतिक्रमणे झाली. अघोषित वाहनतळे उभी राहिली. वाहतूक प्रचंड वाढली.
पादचारी असुरक्षित..
पुणे-मुंबई महामार्गावर सर्वाधिक कोंडी फुगेवाडीकरांची होत आहे. जेमतेम एकेरी वाहतूक होईल, इतकाच रस्ता शिल्लक ठेवला आहे. त्यात भर म्हणून बीआरटीसाठी आणखी रस्ता व्यापून घेतला गेला. फुगेवाडी सिग्नलपासून मेट्रो स्थानकापर्यंत वाहनांची प्रचंड गर्दी होते. अशा स्थितीत रस्त्याने पायी चालणे केवळ अशक्य आहे.
पुराचा धोका, कंपन्यांमुळे प्रदूषण..
पवनेच्या पात्रात भराव टाकण्यात आल्यामुळे फुगेवाडीत नदीचे पात्र अरूंद झाले आहे. पुराचा धोका वाढला आहे. वाढलेले पाणी रहिवाशांच्या घराघरात शिरण्याचा धोका आहे. नदी कायम फेसाळलेली दिसते. येथील कंपन्यांकडून थेट नदीत सांडपाणी सोडले जाते. पालिकेच्या अधिकाऱ्यांना सगळं काही माहिती असूनही त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जाते. एखादी दुर्घटना घडल्यास अशा अधिकाऱ्यांवरच जबाबदारी निश्चित केली पाहिजे.
बाराही महिने पाणीसमस्या..
विस्कळीत, अपुरा आणि दुषित पाणीपुरवठा ही फुगेवाडीकरांची मोठी समस्या आहे. मात्र, ती दुर्लक्षित आहे. बाराही महिने पाणीटंचाई असताना पाणीपुरवठा अधिकारी लक्ष देत नाहीत. पाणीपुरवठ्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असते. निम्मा त्रास या कर्मचाऱ्यांच्या वागण्यामुळेच होतो. फुगेवाडीकरांचे हक्काचे पाणी इतरांना वळवण्यात येते. पक्षपातीपणा करून पाणी सोडले जाते, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.
गावासाठी पाण्याची स्वतंत्र टाकी गरजेची आहे. त्यासाठी आरक्षित जागा उपलब्ध असूनही पाण्याची टाकी उभारली जात नाही.
अंत्यविधीला अडथळे..
रेल्वे ट्रॅकचा लवकरच विस्तार होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे फुगेवाडी रेल्वे रूळालगत लोखंडी पत्रे ठोकून रहदारीचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या ठिकाणी असलेली स्मशानभूमी आणि दफनभूमीकडे जाताच येत नाही. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याचे पार्थिव घाटावर नेता येत नाही. नागरिकांना अंत्यविधीसाठी जाता येत नाही. त्यामुळे नागरिक हैराण आहे. पर्यायी मार्गाचे काम अतिशय संथपणे सुरू आहे. मात्र, याकडे कोणाचे लक्ष नाही.
याशिवाय, रेल्वेचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर जवळपास एक हजार कुटुंबे विस्थापित होऊ शकतील. त्यांचे स्वतंत्रपणे पुनर्वसन करावे लागणार आहे.
नागरी सुविधांची दाणादाण..
फुगेवाडीत नागरी सुविधांची दाणादाण आहे. पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. जी आहेत, त्याची नियमित स्वच्छता होत नाही. स्वच्छतागृहांच्या बाबतीत महिलांची कुचंबना होते.
तरूणांना खेळासाठी मैदान नाही. त्यासाठी सांगवी, पिंपळे गुरवला जावे लागते. ‘जॉगिंग ट्रॅक’, ‘ओपन जीम’चा विचारही करता येत नाही. तरूणांच्या रोजगाराच्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत.
गावात वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. ३० वर्षापूर्वीच्या केबलच्या तारा आहेत. त्या बदलण्यात आल्या नाहीत.
पोलीस चौकीची गरज..
कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने फुगेवाडीत स्वतंत्र पोलीस चौकीची आवश्यकता आहे. कारण, यापुढील काळातही बेकायदेशीर दारूची विक्री होतच राहणार आहे. याशिवाय, गांजा पिणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. गावात निर्जन ठिकाणी दारूची आणि गांजाची नशा करणारे बरेचजण आढळून येतात.
राजकीय प्रतिनिधीत्व हवेच..
फुगेवाडीला पूर्वीप्रमाणे राजकीय प्रतिनिधीत्व मिळत नाही. एखादे पद मिळण्याचा विषयच नाही. संयुक्त प्रभाग म्हणून दापोडी-कासारवाडीला फुगेवाडी जोडण्यात आले. मात्र, दोन्ही गावांच्या तुलनेत फुगेवाडीचे क्षेत्र कमी भरते. त्यामुळे उमेदवारी देताना फुगेवाडीचा विचार होत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी दुय्यम वागणूक देतात. येथील समस्यांकडे कानाडोळा करतात. परिणामी, येथील कामांचा पाठपुरावा होत नाही. त्यासाठी फुगेवाडीकर लोकप्रतिनिधी असणे अत्यावश्यक आहे.
थेट निवडणुकीत संधी देता येत नसल्यास स्वीकृत नगरसेवक तथा प्रभाग स्वीकृत सदस्य करून ही पोकळी भरून काढणे सहज शक्य आहे.
त्यादृष्टीने राजकीय नेत्यांनी विचार करायला हवा.
पोकळ आश्वासने नकोत..
आता फुगेवाडीला पोकळ आश्वासने नकोत, ठोस कृती हवी आहे. विकासाचा न्याय्य वाटा हवा आहे. हळूहळू दारूकांडावरील चर्चा थांबेल, दौरे बंद होतील, कॅमेरे निघून जातील. पण फुगेवाडीच्या समस्या तिथेच राहतील. तसे होता कामा नये.
आधी यंत्रणा झोपली होती का ?
फुगेवाडीतील मिथेनॉल मिश्रित गावठी दारू प्राशन घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून झालेल्या धडक कारवाईत आतापर्यंत दीड कोटी किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १४२ गुन्हे दाखल होऊन ११६ आरोपींना अटक करण्यात आली. ८ हजाराहून अधिक लीटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. दारू निर्मितीसाठीचे ७० हजार लीटर रसायन जागीच नष्ट करण्यात आले. ११ हजार लीटर परराज्यातील व बनावट दारू जप्त करण्यात आली. दारूच्या अवैध वाहतुकीसाठी वापरलेली ११ वाहने जप्त करण्यात आली. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. ही वेगवान कारवाई करणारी शासकीय यंत्रणा आधी झोपली होती का ? अनेकांचा जीव गेल्यानंतरच सरकार, प्रशासन जागे होणार असेल तर त्याचा उपयोग काय ? असा साधा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दारूकांड झाल्यानंतर ज्या तातडीने हालचाली झाल्या. तीच गती, तीच तडफ येथील वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दाखवली पाहिजे. कोणाचे जीव जाईपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही.




















Join Our Whatsapp Group