पिंपरी (Pclive7.com):- सक्षम आणि धाडसी निर्णय घेणा-या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची नोंद युनोने देखील घेतली होती. १९७१ साली बांगलादेशाची निर्मिती करुन पाकिस्तानला धडा शिकविला. पंजाबमधून खलिस्तानवाद्यांना नेस्तनाबूद केले. बँकांचे राष्ट्रीयीकरण करुन गरीब जनतेला खाजगी सावकारांच्या पाशातून मुक्त केले आणि गरीब आदीवासी, मागासवर्गिय समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी गृहमंत्री असताना आरएसएसवर बंदी घालावी अशी मागणी तत्कालीन पंतप्रधानाकडे केली होती. वल्लभभाई पटेल यांची शेवटपर्यंत काँग्रेसवर निष्ठा होती. देशाच्या स्वातंत्र्यपुर्व काळात स्थापन झालेला काँग्रेस पक्ष विचारांवर आणि त्यागावर उभा आहे. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यातिथी निमित्त संततुकाराम पिंपरी येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात साठे बोलत होते. यावेळी माजी महापौर कविचंद भाट यांच्या हस्ते पटेल यांच्या प्रतिमेस आणि पक्ष निरीक्षक व प्रदेश सरचिटणीस रेणुका पाटील यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रदेश महिला कमिटीच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, सरचिटणीस बिंदू तिवारी, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, सेवा दलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, मागासवर्गीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष गौतम आरकडे, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, सुदाम ढोरे, शहर सरचिटणीस विष्णुपंत नेवाळे, ॲड. क्षितिज गायकवाड, सज्जी वर्की, राजेन नायर, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मयुर जैयस्वाल, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, संदेश नवले, आबा खराडे, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगुटमल, डॉ. नंदकुमार दुगड, जयप्रकाश बोराटे, सतिश भोसले, सुनिल राऊत, संकेत बो-हाडे, विश्वनाथ खंडाळे, परशूराम गुंजाळ, दत्तात्रय दातीर पाटील, बाबा बनसोडे, हिरा जाधव, शशीकिरण कांबळे, विरेंद्र गायकवाड, गौरव चौधरी आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. असे एकही नाव भाजपाकडे नाही. आज पंतप्रधान मोदींना त्यांचे आणि भाजपाचे दुकान चालविण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाचा वापर करावा लागत आहे. यातच त्यांचे अपयश आहे. इंदिरा गांधी आणि गांधी घराण्याचे देशासाठी दिलेले बलिदान देशवासी कधीही विसरणार नाही. आगामी काळात देशात आणि राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी परिश्रम घेणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल. असे साठे म्हणाले.
कविचंद भाट, गौतम आरकडे, शामला सोनवणे, सुदाम ढोरे आदींनी श्रध्दांजलीची भाषणे केली.