पिंपरी (Pclive7.com):- काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव व पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांनी अखेर आज (दि.२१) काँग्रेसला रामराम केला आहे. त्यांनी प्रदेश काँग्रेस सचिव पदासह प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
मागील काही वर्षापासून सचिन साठे हे काँग्रेस पक्षात नाराज असल्याचे जाणवत होते. त्यांनी त्यांच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाचा राजीनामा वरिष्ठांवर नाराज होऊनच दिला होता. त्यांच्या राजीनामामुळे शहराध्यक्ष पद कैलास कदम यांच्याकडे गेले व सचिन साठे यांना काँग्रेस पक्षाने प्रदेश सचिव पदावर विराजमान केले होते. शहराच्या पक्ष बांधणीकडे, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांचे लक्ष देत नाहीत अशा अनेकवेळा तक्रारी करूनही काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तक्रारीची दखल घेत नसल्याने सचिन साठे हे नाराज होते. अखेर त्यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व प्रदेश काँग्रेस सचिव पदाचा राजीनामा दिला आहे.
सचिन साठे यांनी राजीनामामध्ये म्हटले आहे की, मी गेल्या २६ वर्षांपासून निष्ठेने काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षीय पातळीवर माझी मोठ्या प्रमाणावर घुसमट होत आहे. पक्षाच्या व्यासपीठावर वेळोवेळी अनेक मुद्दे मी मांडले, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. शहर पातळीवरील पक्षहितासाठी अनेक विषय उपस्थित केले, त्याचीही दखल घेतली गेली नाही. पक्षाकडून अश्या प्रकारे होणारी माझी उपेक्षा मी सहन करू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण यापुढे पक्षात थांबणे योग्य नाही, अशी भावना झाल्याने मी स्वखुशीने राजीनामा देत आहे.
मी १९९७ पासून अर्थात माझ्या विद्यार्थी दशेपासून काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी (यू. आर) होतो. कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू होतो. खेळाडू असताना राजकारणात प्रवेश झाला. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षात काम करण्याचे समाधान मोठे होते. पुढे, एन.एस.यू.आय. चा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदावर काम केले. २०१४ ते २०२० या साडे सहा वर्षांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्षपद भूषवले. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचा निरीक्षक म्हणून काम केले. सध्या प्रदेश सचिव पदाची जबाबदारी आहे. अशाप्रकारे काँग्रेसच्या विविध पदांवर आतापर्यंत निस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे काम केले. मात्र, जी उपेक्षा अलिकडच्या काळात माझी झाली त्यामुळे यापुढे काँग्रेसचे काम करण्याची मानसिकता राहिली नाही. तरी स्वखुशीने प्रदेश काँग्रेसचे सचिव पद आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा मी राजीनामा देत आहे.