पिंपरी (Pclive7.com):- ताथवडे येथील जिल्हा परिषदेची शाळा पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. मात्र, शाळेच्या हस्तांतरावरुन आता शिवसेना शहराध्यक्ष आणि गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये २००९ साली ताथवडे गावचा समावेश करण्यात आला. त्याचवेळी या गावातील जिल्हा परिषदेची शाळा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करणे अपेक्षित होते. तत्कालीन नगरसेविका यमुनाताई पवार यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा सुरू केला होता. पण, शाळेतून बदली झालेल्या काही शिक्षकांनी राज्य शासनाच्या निर्णयला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळली असून, राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच, राज्य शासनाचा निर्णय कायम ठेवावा. यासाठी शिक्षकांच्या बाजुने आम्ही न्यायालयात यशस्वी लढा दिला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे, असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, शिवसेना शहराध्यक्ष राहुल कलाटे यांनीही शाळेच्या हस्तांतराबाबत आम्ही यशस्वी पाठपुरावा केला आहे, असा दावा केला. कलाटे यांनी म्हटले आहे की, शाळेतील विद्यार्थ्यांसह २० शिक्षकांना महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यास जिल्हा परिषदेने मान्यता दिली होती. मात्र, संच शिक्षकांना मान्यता देताना त्यावेळी केवळ १६ शिक्षक असल्याने त्यांना मान्यता दिली. त्यामुळे शाळेतून बदली झालेल्या ४ शिक्षकांनी राज्य शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. परिणामी, जिल्हा परिषद आणि पालिका प्रशासनाच्या हद्दीच्या वादातून शाळेतील मुलांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. या संदर्भात एप्रिल २०१७ मधील सर्वसाधारण सभेत हा विषय मांडला होता. तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे आणि विद्यमान आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेवून चर्चा केली. अखेर न्यायालयाने सकारात्मक निर्णय दिल्याने हा प्रश्न मार्गी लागला असल्याचे ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ मध्ये राहुल कलाटे आणि संदीप पवार एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. या निवडणुकीत पवार यांना पराभव पत्कारावा लागला होता. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच कलाटे व पवार आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शाळा हस्तांतराच्या मुद्यावरुन कलाटे-पवार यांच्या श्रेयवाद रंगला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.