(Pclive7.com):- तुम्हाला सतत खूप थकल्यासारखे किंवा गळून गेल्यासारखं वाटतंय? मग नक्कीच तुमचे योग्य पद्धतीने पोषण होत नाहीये. शरीराचे चांगल्यारितीने पोषण होण्यासाठी आहारात आवश्यक ते घटक पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक असते. जर तुम्हाला बराच काळ थकल्यासारखे वाटत असेल तर काही पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. कदाचित तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यानेही तुम्हाला असे थकल्यासारखे वाटू शकेल. विशेषतः महिलांमध्ये शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्याने विविध तक्रारी उद्भवतात. अॅनिमिया हा त्यातील सर्वात आघाडीवर असणारा आजार आहे. तो होऊ नये यासाठी प्रत्येक महिलेने आणि कुटुंबातील व्यक्तींनीही योग्य ती काळजी घ्यायला हवी.
शरीरात हिमोग्लोबिनची निर्मिती होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. पुरुषांना दररोज साधारण २८ मिलीग्रॅम आणि महिलांना ३० मिलीग्रॅम लोहाची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्हाला थकवा आल्यासारखे किंवा गळून गेल्यासारखे वाटत असेल तर आहारात बदल करणे आवश्यक आहे. कोणत्या घटकांचा आहारात समावेश करायला हवा याविषयी…
काजू आणि बिया
दररोज ठराविक प्रमाणात काजू आणि बदाम खायला हवेत. याशिवाय तुम्ही आक्रोड, जर्दाळूही खाऊ शकता. जेवणातील एखाद्या पदार्थात किंवा नुसताही हा सुकामेवा खाल्ल्यास फायदा होतो. याशिवाय भोपळ्याच्या बिया किंवा इतर बिया आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतात. संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणूनही या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. हे सगळे घटक तुमच्या शरीरातील लोह वाढविण्यासच नाही तर व्हिटॅमिन्स आणि खनिजे वाढविण्यासाठीही उपयुक्त असतात.
कडधान्ये
शाकाहारी लोकांसाठी कडधान्ये म्हणजे महत्त्वाचा अन्नघटक आहे. कडधान्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, प्रोटिन, फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात. याबरोबरच कडधान्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. काळे वाटाणे आणि हरभरा यांमध्ये जास्त प्रमाणात लोह असते. त्याबरोबर इतर सर्व कडधान्येही आरोग्यासाठी आवश्यक असतात.
पालेभाज्या
पालेभाज्या हा लोहाचा एक महत्त्वाचा स्त्रोत असतो. यातही पालक आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. विशेष म्हणजे या भाज्यांमधून योग्य प्रमाणात उपयुक्त घटक मिळावेत यासाठी या भाज्यांमध्ये टोमॅटो आणि बटाटा घालावा. दिवसातून एकदा तरी पालेभाजी आहारात असायला हवी.
फळे
डाळिंबासारख्या काही फळांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आहारात फळांचा समावेश असणे आवश्यक आहे. फळांमधून शरीराला आवश्यक इतरही अनेक घटक मिळतात. तसेच फळांचा पोट भरण्यासाठी उपयोग होतो. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही फळांचा उपयोग होतो.