दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द करा, नाना काटे यांचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण पूर्णपणे भरले आहे. तरी देखील शहरवासीयांवर कृत्रिम पाणी टंचाई कशासाठी? असा सवाल माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित केला आहे. तसेच शहरात सध्या होत असलेला दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द करून दररोज पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी नाना काटे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
नाना काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात चांगल्या व मुबलक योग्य प्रमाणात पाऊस पडला आहे. ही आपल्यासाठी आनंदाची बाब असताना देखील शहरवासीयांवर दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या नावाखाली कृत्रिम पाणी टंचाईची टांगती तलवार कशासाठी?, कटिबद्ध जनहिताय हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार शहरवासियांना योग्य सुविधा देणे व तसेच समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे.
परंतु गेल्या वर्षभरापासून प्रशासन व पाणीपुरवठा विभागाच्या मनमानी, नियोजन शून्य व भोंगळ कारभारामुळे धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असताना देखील शहरातील टॅकर लॉबीला फायदा व्हावा म्हणून महापालिका प्रशासनाने तांत्रिक अडचणीचे कारण देत दिवसाआड पाणीपुरवठा हा पाणी कापतीचा निर्णय घेवून शहरात कृत्रिम टंचाई निर्माण केलेली आहे. याचा शहरातील नागरिकांना नाहक त्रास होत असून शहरवासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हि खूप गंभीर बाब असून, म्हणून याचा विचार करता आयुक्तांनी त्वरित दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द करावा. तसेच संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात दररोज व पुरेशा दाबाने योग्य प्रमाणत पाणी पुरवठा करावा असे आदेश संबंधित पाणीपुरवठा विभागाला देण्यात यावेत. शहरवासीयांवर गेल्या वर्षभरापासून प्रशासनाने लावलेले कृत्रिम पाणी टंचाईचे संकट दूर करावे अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.