पिंपरी (Pclive7.com):- ‘आम्ही सर्व प्रतिज्ञा करतो की आम्ही जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करू. तसेच आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद आम्ही हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व सांविधानिक मार्गाने सोडवू’, अशी प्रतिज्ञा महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली.
भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी उप आयुक्त विठ्ठल जोशी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, बालाजी अय्यंगार, चारूशीला जोशी तसेच विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. प्रतिज्ञेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती २० ऑगस्ट रोजी असते आणि त्याच दिवशी सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात येते, तथापी महाराष्ट्र शासन निर्देशानुसार रविवार २० ऑगस्ट ऐवजी १८ ऑगस्ट रोजी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात यावा असे कळविण्यात आले आहे. त्या निर्णयानुसार महानगरपालिकेत अभिवादन व सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला.