पिंपरी (Pclive7.com):- संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या आळंदी शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याठी शहराबाहेरून जाणारा बाह्यवळण रस्ता तातडीने तयार करण्याबरोबरच पीएमपीएमएल बसथांबा ते मरकळ हा बाह्यवळणाचा रस्ता करावा, मरकळ रस्ता ते वडगाव घेणंद रस्त्याचे रूंदीकरण करावे, वडगाव घेणंद रस्ता ते आळंदी ग्रामीणमधून जाणारा केळगाव रस्ता तातडीने करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य प्रा. उत्तम केंदळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यासंदर्भात नगरसेवक प्रा. केंदळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आळंदी ही वारकऱ्यांची पंढरी आहे. त्यामुळे आळंदीमध्ये देशभरातून हजारो नागरिक दररोज येतात. त्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचप्रमाणे आळंदीतून देहूगाव, भोसरी, मरकळ, वडगाव घेणंद, केळगावमार्गे चाकण या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात दैनंदिन वाहतूक होत असते. त्याचप्रमाणे रांजणगाव, चाकण आणि भोसरी या तीनही ठिकाणच्या औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो कामगार आळंदीमार्गे दररोज ये-जा करत असतात.
परिणामी आळंदीमधील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. या शहरात रस्त्यांचे आणि वाहतुकीचे कोणतेच नियोजन न केल्यामुळे दळणवळणाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांचे जगणेही मुश्किल झाले आहे. ही बाब गंभीरपणे घेऊन या शहराला वाहतुकीच्या कोंडीतून मुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वात आधी शहरातील रस्त्यांचा नियोजन आराखडा तयार करावा.
त्याचप्रमाणे आळंदीबाहेरून जाणारा बाह्यवळण रस्ता करण्याबरोबरच अन्य रस्तेही मोठे केल्यास नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका होऊ शकते. पीएमपीएमएल बसथांबा ते मरकळ रस्ता बाह्यवळणाचा करावा, मरकळ रस्ता ते वडगाव घेणंद रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्यात यावे. तसेच वडगाव घेणंद रस्ता ते आळंदी ग्रामीणमधून केळगाव रस्ताही तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”