पिंपरी (Pclive7.com):- २०२४ चा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक झाली म्हणून.. मावळ लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर मी निवडणूक लढवणार आहे. मतदारच कोणाला निवडून द्यायचे हे ठरवत असतो. त्यामुळे मावळची जनता विकासाला मत देतील असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नेते संजोग वाघेरे यांनी आज शिवसेनेत (उद्धव ठाकरे) प्रवेश केला. मावळमधून वाघेरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
खासदार संजय राऊत यांनी मावळ पुन्हा खेचून आणणार असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना श्रीरंग बारणे म्हणाले की, कुणी काही बोललं म्हणजे उमेदवार विजयी होत नसतो. जे बोलले आहेत त्यांनी एक तरी सार्वजनिक निवडणूक लढवली आहे का?, ते दररोज बोलतात.. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. मी कुणाच्या आव्हानाला भीक घालत नाही.
पुढे ते म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये आदिवासी, दुर्गम भागामध्ये लाईट, रस्ते पोहचवले. पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. आठ-नऊ वर्षे पवना धरणातून गाळ काढला. सर्वांना बरोबर घेऊन कोणतीही शासकीय मदत न घेता हा गाळ काढला. त्यामुळे शहराला आज दररोज पाणीपुरवठा होत आहे. जनतेसाठी या शहरात मी आंदोलन पुकारलं, सर्वसामान्य माणसाच्या घराला न्याय देण्याची प्रक्रिया केली. शास्ती माफ करण्याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला. त्यामुळे सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय मिळालेला आहे. जेएनपीटी पासून पनवेल पर्यंत रस्ता जाम होत होता. कंटेनर तास अन् तास उभे राहत होते. त्या ठिकाणचा रस्ता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या माध्यमातून केला. तळेगाव ते चाकण शिक्रापूर या मार्गाचा डिपीआर मंजूर झाला आहे. त्याला केंद्र सरकार आता मंजुरी देत आहे. वाकड पासून जाणारा चांदणी चौकाचा मार्ग जवळपास साडेआठ किलोमीटरचा आपण उभा करतो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्राच्या योजना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या अनेक योजना या शहरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेल आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आहे. मतदारापर्यंत माझा डायरेक्ट संपर्क आहे. त्यामुळे मी कुणाच्याही आव्हानाला भिक घालत नाही.
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी मलाच उमेदवारी द्यायची असं ठरवलं आहे. संजोग वाघेरे यांच्या बद्दल बोलणं योग्य ठरणार नाही. कुठल्याही विरोधी पक्षाच्या उमेदवारावर मी कधी व्यक्तिगत बोलत नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर मी निवडणूक लढवणार आहे. मतदारच कोणाला निवडून द्यायचे हे ठरवत असतो. २०२४ चा निकाल लागेल तेव्हा श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक झालेली सर्वांना दिसून येईल असं ते म्हणाले.