पिंपरी (Pclive7.com):- आजची तरुणाई जिथे जाईल तिथे सेल्फीमध्ये दंग असते. सेल्फीच्या इमेजमध्ये अडकण्यापेक्षा स्वतःची सेल्फ इमेज तयार करा. आयुष्यभर मनुष्य कर्म करतो. त्याची फळे भोगतो. ती कधी चांगली असतात तर कधी वाईट. केलेल्या कर्मामुळेच हे भाग्य मनुष्याच्या वाटेस येते. म्हणूनच सत्कर्म करण्यावर सर्वांनी भर दिला पाहिजे, असे मार्गदर्शन प्रल्हाद वामनराव पै यांनी भोसरी येथे केले.
भोसरी येथे आमदार महेश लांडगे मित्र परिवाराने आयोजित केलेल्या ‘संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्यात ‘सुखी जीवनाचे गुपित’ या विषयावर प्रल्हाद पै यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डिकर, पक्षनेता एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, भाजप प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, ज्येष्ठ नगरसेविका भीमाताई फुगे, नगरसेवक बाबू नायर, जीवनविद्या मिशनचे माजी विश्वस्त शैलेश जोशी, पै. किसनराव लांडगे, सचिन बबनराव लांडगे, पिंपरी चिंचवड नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते जीवनविद्या मिशनच्या मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आले.
पै पुढे म्हणाले की, आपल्या मनासारखी एखादी गोष्ट घडली नाही की लगेच कोणावरतरी ‘ब्लेम’ करतो. परंतु ते चुकीचे आहे. कारण आपण सतत जे कार्य करतो, त्याचे फळ आपल्याला मिळालेले असते. दिवा विझला की वा-याला दोष देतो. पण कधी निट निरीक्षण केले तर दिव्यामध्ये तेलच कमी असल्याचे लक्षात येते. तद्वतच आपण चांगले कर्म करण्यात कमी पडलो तर अपयश हे येणारच. जीवनावर आपण मिथ्थ्या प्रेम करतो. परंतु कुठलीही गोष्ट जीवन प्रवास संपताना बरोबर येत नाही. फक्त कर्म बरोबर येते. आयुष्यभर लेबल घेऊन मनुष्य जगतो. जीवन मरणात एका श्वासाचा फरक आहे. मरणानंतर सर्व लेबल गळून पडतात. फक्त शरीर राहते. शेवटी शरीर देखील नष्ट होते. शिल्लक उरते ते कर्म. मनुष्य गेल्यानंतर त्याची पत्नी दरवाजापर्यंत पोहचवण्यास येते, समाज स्मशानापर्यंत तर पुत्र अग्नी देण्यासाठी येतो. त्यानंतर बरोबर येते ते कर्म. पण माणूस कर्मावर नाही फक्त उपरवाल्यावर विश्वास ठेवतो. कर्म चांगले नसेल तर फळ कसे चांगले मिळणार, असे पै म्हणाले.
प्रत्येक क्षणाचा चॉईस असतो. तो निट निवडला पाहिजे. त्यामुळे दुस-याला दोष देऊ नका. जेणे करून आयुष्य चांगले जाईल. कर्मा विषयी अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले, कर्माची तोंडे तीन आहेत. संचित, प्रारब्ध, क्रीयमान. जन्मोजन्मीचे पाप-पुण्य हे संचितामध्ये आहे. संचितामधून जे मिळते म्हणजेच जे बाहेर येते ते प्रारब्ध आणि रोज करतो ते क्रीयमान. यालाच आपण कर्म म्हणतो. जो नम्र झाला त्याला सर्व समाज मान देतो. आपले लक्ष्य कर्माकडे नसते. कार्यक्रमास भोसरी पंचक्रोशीतील नागरिक, साधक, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.