पुणे (Pclive7.com):- पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील नारायण महाराज यांचे सोमवारी, ९ सप्टेंबरला निधन झालं आहे. संध्याकाळच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने नारायण महाराज यांचं निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. नारायणपूर येथील दत्त मंदिरात नारायण महाराज यांचं वास्तव्य होतं. नारायणपूरला एक मुखी दत्त मंदिर आहे, तिथेच ते राहायला होते.

दुपारी ४ वाजता पार पडणार अंत्यसंस्कार
भाविकांचे श्रद्धास्थान परमपुज्य निश्खचैतन्य श्री सदगुरु नारायण महाराज हे ‘अण्णा’ या नावाने ओळखले जायचे. राज्यभरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे. नारायण महाराजांचं पार्थिव सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी नारायणपूर येथील मंदिरात ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी ४ वाजता नारायणपूर येथील यज्ञकुंडाजवळ पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. नारायण महाराज यांच्या जाण्याने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
भारतातील चार दिशांना चार दत्तधाम बांधले
नारायण महाराज हे विविध समाजकार्यात नेहमी अग्रेसर असायचे. सामुदायिक विवाह सोहळ्याला त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिलं. गावोगावी आपल्या शिष्यांच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती चळवळ, सामुदायिक शेती आणि श्रमदानाचे उपक्रम राबवले. नारायण महाराजांनी भारतातील चार दिशांना चार दत्तधाम बांधले, त्यापैकीच एक नारायणपूर आहे. नारायण महाराज यांचं अंत्यदर्शन मंगळवारी (१० सप्टेंबर) दुपारी २ पर्यंत श्री क्षेत्र नारायणपूर येथे घेता येणार आहे. सायंकाळी चारला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.






















Join Our Whatsapp Group