मावळ (Pclive7.com):- आपण सर्वांनी आम्हाला विकासकामांसाठी निवडून दिले आहे. त्या विकासकामांसाठीच आम्हाला बोलवा, अन्य कार्यक्रमाला बोलावू नका, अशी विनंती वजा आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले. वडगाव मावळ येथे शनिवारी (दि.८) महायुती व मित्र पक्षांच्या वतीने आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शेळके बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, पुढील पाच वर्षात तालुक्यातील शिल्लक राहिलेली विकासकामे मार्गी लावू व तालुक्याचा पूर्ण कायापालट करू, अशी ग्वाही देखील मावळच्या जनतेला दिली.

याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आरपीआयचे (आठवले गट) प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे, एसआरपी पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे, लोणावळा शहरातील भाजपा नेते देविदास कडू, गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, शरद हुलावळे, साहेबराव कारके, दिपाली गराडे आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत, राज्यात महायुतीचे कणखर सरकार आले असून महायुतीवर विश्वास ठेवून आम्ही मावळचा विकास करणार आहोत. यासाठी आपण सर्वांनी मनापासून भक्कमपणे महायुतीच्या पाठीशी उभे राहून साथ द्यावी, असे आवाहन बारणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन राज खांडभोर यांनी केले. किशोर सातकर यांनी आभार मानले.






















Join Our Whatsapp Group