पिंपरी (Pclive7.com):- जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशने “चला गावाकडे” हा उपक्रम हाती घेतला आहे. या दिवशी महाश्रमदान दिन म्हणून साजरा करण्यात आला. या आवाहनाला साथ देत पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या सुमारे २०० सदस्यांनी पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात श्रमदान केले. या स्पर्धेत उन्नती सोशल फाऊंडेशनला प्रथम क्रमांक मिळाला.
राज्यात पाण्याचे संकट मोठ्या प्रमाणात असल्याने राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहे. यावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशने मागील अनेक वर्षांपासून राज्यातील खेड्यापाड्यात श्रमदानातून जमिनीत पाणी जिरविण्यासाठी शेतात, माळावर सोर्स खडे तयार केले जात आहेत. जेणे करून जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. यासाठी पाणी फाऊंडेशन दिवसरात्र काम करीत आहे. याला नागरिकही चांगला प्रतिसाद देत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जागतिक कामगार दिनानिमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त एका अनोख्या प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला. “चला गावाकडे”
अशी हाक देताच राज्यातील अनेक गावांत या दिवशी लाखो नागरिकांनी सहभाग नोंदविला. शेतकर्याप्रती आपले योगदान दिले. अनेक गावांत स्पर्धा घेण्यात आल्या ज्या टीमने चांगले व जास्त काम केले, अशा टीमला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात ठिकठिकाणच्या १८ गटातून सुमारे ६०० नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी गावकार्यानी कामाची पाहणी करून स्पर्धेचे बक्षिस जाहीर केले. यावेळी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आले. प्रथम क्रमांक पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनला मिळाला. संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे यांना पानवडीचे सरपंच सुषमा भिसे व पुरंदर पंचायत समिती सदस्य नलिनी लोळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
यावेळी उपसरपंच संदीप भिसे, ग्रामपंचायत सदस्य अनिता लोळे, मंगल दिवार, निवृत्ती लोळे, सुरेखा लोळे, रामदास भिसे, माजी सरपंच हरिभाऊ लोळे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव भिसे, अनिल भिसे, आबा लोळे, अमोल लोळे, रमेश दिवार यांच्यासह ग्रामस्त व महाश्रमदानासाठी आलेले नागरिक, योगा हास्य क्लब पिंपळे सौदागर सदस्य व उन्नतीचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
समाजासाठी बांधिलकी आपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. ही भावना सध्या अनेकांच्या मनात जागृत होत आहे. पाणी फाऊंडेशने एक दिवस महाश्रमदान अशी हाक देताच अगदी लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांनीच उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. प्रत्येकांनी जमेल तेवढे श्रमदान केले, त्यामुळे समाजातील शेतकऱ्याबद्दलच्या भावना जागृत होत आहे. आणि सामाजिक बांधिलकी काय आहे याची जाणीव होत आहे.