पिंपरी (Pclive7.com):- पर्यावरण संरक्षणासाठी यापुढील काळात हरित इमारती बांधणे आवश्यक आहे. हरित इमारत बांधकाम जमीन, सामग्री, ऊर्जा, पाण्याचा कार्यक्षम वापर करते. तसेच यात ऊर्जा कार्यक्षमता वाढ, पाण्याचा पुनर्वापर केला जातो. त्यामुळे हरित इमारती या पर्यावरणपूरक असतात. वास्तू रचनाकार आणि स्थापत्य अभियंता यांनी हरित इमारती बांधणीवर भर दिला पाहिजे असे मत स्प्राउट कन्सुलन्सीच्या संचालक नम्रता धामणकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) यांच्या संयुक्त विद्यामानें “इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे उद्दिष्टे आणि हरित इमारत” या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी हरित इमारत-रचना, शाश्वत पर्यावरण आणि दृष्टिकोन या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी (सहयोगी प्राध्यापक, एसबीपीसीओएडी), आर्किटेक्ट ऋजुता पाठक (समन्वयक, आयजीबीसी स्टुडंट चॅप्टर व सहयोगी प्राध्यापक, एसबीपीसीओएडी), स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुदर्शन बोबडे उपस्थित होते.
आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी म्हणाले की, हरित इमारती बांधताना संसाधनांचा कार्यक्षम वापर, रहिवाशांच्या आरोग्याचे रक्षण तसेच कचरा, प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास कमी करून मानवी आरोग्यावर, नैसर्गिक पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाहीत याची काळजी घेतली जाते.

प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी शाश्वत पर्यावरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल पीसीसीओईआर स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे कौतुक केले. कार्यक्रमास स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शाश्वत, हरित इमारती आणि निसर्ग वाचवण्यासाठी समग्र दृष्टिकोनाची शपथ घेतली. डॉ. सुदर्शन बोबडे यांनी स्वागत केले. प्रा.चेतन चव्हाण यांनी आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.