हिंजवडीतील प्रश्नांच्या अनुषंगाने घेतली आढावा बैठक
पिंपरी (Pclive7.com):- प्रशासकीय स्तरावरील विविध यंत्रणांनी आपली जबाबदारी सहजपणे पार पाडत नागरी समस्या दूर करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. मात्र हिंजवडी भागातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागातील नागरी समस्या निराकारणाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.११) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आकुर्डी कार्यालयात आढावा बैठकीत नागरिकांना दिलासा मिळेल, अशा कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिले. यावेळी विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.

हिंजवडी, मान, मारुंजी यासह इतर काही भागात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांसह नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओढे – नाल्यांतील पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे प्रामुख्याने या समस्या पुढे येत आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावरील सर्व यंत्रणांनी सामूहिक प्रयत्न करून ओढे – नाल्यांची स्वच्छता करत रस्त्यावरील डेब्रिज तातडीने उचलून घेण्याचे निर्देश यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. हिंजवडी भागात सुरू असलेल्या मेट्रोसह इतर कामांमुळे रहदारीस अडचणी ठरत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने आपली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. यासह नागरी समस्या सोडवण्याच्या दृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करत दृश्य स्वरूपात कामातून बदल दिसेल, अशी कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, या बैठकीत देण्यात आले.

या बैठकीला आमदार शंकर मांडेकर, पीएमआरडीएच्या विकास व परवानगी विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे, अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील यांच्यासह एमआयडीसी, एमपीसीबी, पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लि., जिल्हा परिषद, एमएसईडीसीएल, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन, पीसीएमसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंजवडीतील कंपन्यांचे प्रतिनिधी, सोसायट्यांचे पदाधिकारी, एमएसईटीसीएल, वाहतूक पोलीस, हिंजवडी, मान, मारुंजी या ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हिंजवडी, मान, मारुंजी यासह इतर भागातील नैसर्गिक नाल्यातील पाण्याचा प्रवाह रोखणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नाल्याभोवती उभारण्यात आलेल्या बांधकामांचा सर्वे करून संबंधित बांधकामे अधिकृत आहेत की अनधिकृत याचा अहवाल तातडीने सादर करून अनाधिकृत बांधकामे तातडीने पाडण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी बैठकीत दिले. यासह काही कंपन्या दूषित पाणी नाल्यात सोडत असल्यामुळे नागरिकांना त्रास होतो. अशा कंपन्यांची चौकशी करून त्यांची बांधकामे अनधिकृत असेल यासह शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश यावेळी महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी दिले.
