पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ‘विकसित भारत संकल्प कार्यशाळा’ संपन्न
पिंपरी (Pclive7.com):- आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध विकास योजना आणि गेल्या ११ वर्षांतील ४ कोटी लोकांना पक्की घरे, ‘हर घर जल’ योजना, आयुष्मान भारत योजना यांसारख्या जनहिताच्या योजनांच्या कामगिरीची आणि सरकारच्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोविणे आवश्यक असून, २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा, असे आवाहन भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी केले. पिंपरी-चिंचवड शहरात गोविंद गार्डन बॅंक्वेट हॉल, पिंपळे सौदागर येथे “विकसित भारत संकल्प सभा आणि जिल्हा कार्यशाळा” पार पडली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने देशभरात ‘संकल्प ते सिद्धी’ अभियान सुरू केले आहे. याच अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हा प्रभारी वर्षा डहाळे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, नितीन काळजे, राहुल जाधव, सरचिटणीस संजय मंगोडेकर, विलास मडेगिरी, अजय पाताडे, शीतल शिंदे, महेश कुलकर्णी, दक्षिण आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, काळूराम बारणे, संतोष कलाटे, माउली थोरात, राजू दुर्गे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, विकास डोळस, मंडलाध्यक्ष गणेश ढोरे, सोमनाथ तापकीर, सनी बारणे, हर्षल ढोरे, मोहन राऊत, जयदीप खापरे, मंगेश धाडगे, धरम वाघमारे, अनिता वाळूंजकर, शिवराज लांडगे, अमोल डोळस, अजित बुर्डे, रामदास कुटे, योगेश सोनवणे यांच्यासह विधानसभा निवडणूक प्रमुख,नगरसेवक,जिल्हा पदाधिकारी,सर्व मोर्चा / आघाडी/प्रकोष्ठ प्रमुख,मंडल पदाधिकारी,शक्तिकेंद्र प्रमुख आणि इच्छुक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपा शहराध्यक्ष भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी कार्यकर्त्यांना सरकारच्या योजनांचा प्रभावीपणे प्रचार कसा करायचा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानांतर्गत १० ते १२ जून या काळात जिल्हास्तरावर प्रदर्शने, संवाद सत्रे आणि कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. याव्यतिरिक्त, १६, १७ आणि १८ जून दरम्यान विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. ५ जून रोजी ‘एक वृक्ष मातृभूमीसाठी’ हे विशेष अभियान सुरू करण्यात आले असून, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर १७ ते २० जून दरम्यान योग सत्रांची मालिका आयोजित केली जाईल. २५ जून १९७५ रोजी लादण्यात आलेल्या आणीबाणीस स्मरून देशभरात जनजागृती कार्यक्रमही घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप आमदार शंकर जगताप यांनीही आपल्या भाषणात, केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा उल्लेख करत, या योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात कशाप्रकारे सकारात्मक बदल घडत आहेत, यावर प्रकाश टाकत त्यांनी कार्यकर्त्यांना या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांची नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. जगताप म्हणाले, “पूर्ण ताकदीने यंदाच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. मोदी सरकारची ही ११ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची आहेत.” “मोदी सरकारने गेल्या ११ वर्षांत देशाच्या विकासाला नवी दिशा दिली आहे. रस्ते, कारखाने, सौर ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व प्रगती झाली आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र व राज्य सरकारचे विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ”

आमदार महेश लांडगे यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ या सरकारच्या ध्येयानुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजाविणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्काचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे काम करावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमांद्वारे लोकांना सरकारच्या कामगिरीबद्दल माहिती देऊन त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार अमित गोरखे म्हणाले कि, “गेल्या 11 वर्षांपासून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाच्या विकासाला एक नवी दिशा दिली आहे. रस्ते, रेल्वे, विमानतळे यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये झालेली क्रांती असो किंवा जन धन, आयुष्मान भारत यांसारख्या योजनांद्वारे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न असो, प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनांमुळे आज भारत जागतिक स्तरावर एक मजबूत आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
जिल्हा प्रभारी वर्षा डहाळे म्हणाल्या, “पंतप्रधान मोदींच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात झालेला विकास हा केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नाही, तर तो कोट्यवधी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा आहे. ‘हर घर जल’ सारख्या योजनांमुळे ग्रामीण भागातही मूलभूत सुविधा पोहोचल्या आहेत, तर मुद्रा योजनेमुळे लाखो युवकांना आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे. डिजिटल इंडियाने प्रशासनात पारदर्शकता आणली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक संजय मंगोडेकर यांनी केले. सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी तर आभार विकास डोळस यांनी मानले.