

पिंपरी (Pclive7.com):- आजच्या काळात विद्यार्थी मोबाईलचा वापर जास्त करताना दिसतात. मात्र या मोबाईलच दुष्परिणाम आज विद्यार्थ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर आपले लक्ष केंद्रित करावे आणि अभ्यासाबरोबर असपल्या शारिरीक क्षमतेवर देखिल लक्ष देण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती पदक विजेते दत्तात्रय पाष्टे यांनी व्यक्त केले.

कोकण खेड तालुका अठरागांव रहिवासी विकास संस्थेचा स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपती पदक विजेते आणि डायमंड पब्लिकेशनचे चेअरमन दत्तात्रय पाष्टे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, माजी नगरसेविका निर्मलाताई कदम, विजया सुतार, संस्थेचे अध्यक्ष अशोक कदम, कॅप्टन श्रीपत कदम, कॅप्टन संजय कदम, संदिप साळुंखे, पांडुरंग कदम, दत्तात्रय महाडिक, मारूजी यादव, वैजंयती कदम, मनोहर यादव, अनंत कदम, राजेंद्र कदम आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना दत्तात्रय पाष्टे म्हणाले की, आज मोबाईल हे जीवनावश्यक बनले आहे. परंतु आजच्या काळात मुले ही या मोबाईलच्या आहारी जास्त गेल्याचे दिसून येते. आज मुलांना मोबाईल देण्यामध्ये पालकांचाचे सहभाग असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलच वापर कमी करून अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अभ्यासाबरोबर आपली शारिरीक क्षमता चांगली राखण्यावर भर दिला पाहिजे. पालकांनी सुध्दा आपला मुलगा मोबाईलपासून दुर कसा राहिल हे पाहिले पाहिजे आणि त्याची सुरूवात पालकांनी आपल्यापासून करणे गरजेचे आहे. मुलांनी पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. मैदानी खेळ खेळले पाहिजे. असे ते म्हणाले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारल्याने त्यांचे मनोबल वाढते. आज कोकणातील मुले आज कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेली नाही. आणि हे खरंच आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. मुलांनी अशीच प्रगती करून आपल्या आई-वडिलांचे नाव तसेच कोकणाचे नाव उज्वल करावे असे ते म्हणाले.

संस्थेचे अध्यक्ष अशोक कदम म्हणाले की, 2000 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. आज या संस्थेला 25 वर्षे पुर्ण होत आहे. आणि हे खरंच आनंदाची बाब आहे. या संस्थेच्या माध्यमातुन आजवर अनेक सामाजिक उपक्रम घेण्यात आले. आणि यापुढे देखिल आम्ही असेच सामाजिक उपक्रम घेणार आहोत. कोकणातुन नोकरीसाठी येथे आलेल्या लोकांनी आजपर्यंत या संस्थेला चांगली मदत केली आणि त्यामुळेच आज हा मोठा पल्ला आम्ही गाठला आहे. 2000 साली लावलेले हे रोपटे आता खुप मोठे झाले आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिव मारूती यादव यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. संदिप कदम यांनी केले. यावेळी दहावी व बारावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महिलांचा व लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी घेण्यात आला.






















Join Our Whatsapp Group