पिंपरी (Pclive7.com):- राजकीय व्देशातून माझे पती अँड. सुशिल मंचरकर यांना खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे. २०१४ पासून वारंवार त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आता पुन्हा महिलेवर गोळीबार केल्याप्रकरणी त्यांना या प्रकरणात गोवले जात आहे. वारंवार होणार्या या प्रकारामुळे आमची सहनशिलता संपली आहे. जर याबाबतीत काही निर्णय घेतला गेला नाही तर, मी माझ्या दोन मुलींसह आत्महत्या करेल असा इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेविका गिता मंचरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
अँड. सुशील मंचरकर हे राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती आहेत. तुरूंगातील आरोपी पळवून लावणे, कामगार नेते कैलास कदम यांच्या हत्येचा कट रचणे, असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्यांना मोक्का लावण्यात आला आहे. तसेच गेल्या आठवड्यात पिंपरीत एका महिलेवर गोळीबार झाला होता. त्या महिलेने २०१४ मध्ये मंचरकर यांच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दिली होती. त्या गोळीबारप्रकरणी खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात मंचरकर यांना अटक करण्यात आली आहे.
सुशिल मंचरकर यांना वारंवार खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याचे सांगत नगरसेविका गिता मंचरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी माजी नगरसेवक कैलास कदम यांच्यावर आरोप केलेत. कदम हे राजकीय व्देषापोटी माझ्या पतींना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच मला व माझ्या कुटुुंबियांच्या जीवाला कदम यांच्यापासून धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी कैलास कदम यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. कदम म्हणाले की, मंचरकर यांनी माझ्यावर केले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. पहिल्यापासून त्यांच्याकडून असे खोटे आरोप माझ्यावर केले जात आहेत. त्यांच्यावर काय गुन्हे दाखल होतात त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. उलट मंचरकर यांनीच माझी सुपारी दिली असल्याचे पोलीसांनीच उघड केले होते. त्यांच्याकडूनच माझ्या जीवास धोका आहे.