पिंपरी (Pclive7.com):- हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे एकत्व आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण होय. असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी येथे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जयोस्तुते हे जे स्वातंत्र्य गीत लिहिले आहे, त्यात हे अधम रक्तरंजिते म्हटले आहे. म्हणजे अधमाचे रक्त सांडून ही स्वतंत्रता मिळाली आहे. याचे स्मरण होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

चिंचवड गावातील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने सिल्वर गार्डन येथे गणेशोत्सवानिमित्त सात्यकी सावरकर यांचे व्याख्यान व त्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष शमीम पठाण, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, योगेश चिंचवडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कलशेट्टी, मीना पोकर्णा, अभय पोकर्णा आदी उपस्थित होते.

वादाचे मुद्दे टाळून एकत्र यायला हवे. समान रक्त समान संस्कृती समान इतिहास या निकषाच्या आधारे आपण सारे एकमेकांचे हिंदू बंधू आहोत. हा विचार महत्त्वाचा आहे असे सावरकर म्हणाले. भारत स्वतंत्र व्हावा तो अखंड राहावा, या देशात कोणत्याही नागरिकाची जात, लिंग न पाहता त्याला समान अधिकार हवेत. हा विचार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडला होता. मात्र देशात विशिष्ट समाजाचे चाललेले लांगुलचालन अयोग्य असल्याचे सात्यकी सावरकर यांनी सांगितले.

यावेळी नंदकुमार सातुर्डेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जो तो आपल्या सोयीने अर्थ लावत आहे. मात्र त्यांचा विज्ञानवाद सुद्धा समजून घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले. लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याचे स्मरण गणेशोत्सव मंडळांनी ठेवावे. गणेशोत्सवातील बिभत्सपणा, डीजेचा वापर, टाळून उत्सवाला विधायक वळण देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

मीना पोकर्णा यांनी स्वागत केले. ईशा ढुमणे व जया सेठ यांनी जयस्तुते हे स्वातंत्र्य गीत सादर केले. अद्वैत दिवाण यांनी सूत्रसंचालन केले. रुई कोलगिकर यांनी आभार मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीना पोकर्णा, अभय पोकर्णा, आनंद ढुमणे, मिथिलेश ब्रीद, ऋतुराज गरुड यांनी परिश्रम घेतले.






















Join Our Whatsapp Group