पिंपरी (Pclive7.com):- ‘स्वाईन फ्ल्यू’मुळे पिंपरी चिंचवड शहरातील २० जणांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांच्या मृत्यूला प्रशासन आणि सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आज महासभेत केली.
महासभेत बोलताना राहुल कलाटे म्हणाले, पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची नवीन प्रथा सुरु झाली आहे. शहरात कुत्रे, डुक्करांचा सुळसुळाट सुरु असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी कुत्र्यांची पिल्ले आणली होती. तथापि, सत्ताधारी नगरसेवकांनी कुत्र्यांची पिल्ले लहान असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची भाषा सुरु केली. कुत्र्यांची पिल्ले आणण्या मागची भावना समजून घेणे अपेक्षित आहे. विरोधकांनी शहरातील जनतेसाठी हा प्रश्न मांडला आहे. पंरतु, सत्ताधारी प्रश्न सोडविण्याऐवजी आंदोलन करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करतात, हे अत्यंत चुकीचे आहे. सत्ताधा-यांना विरोधकांवर गुन्हे दाखल करण्याची खूपच हौस आहे.
‘स्वाईन फ्लू’ने पिंपरी चिंचवडमध्ये कहर माजविला असून जानेवारीपासून २० जणांचा बळी घेतला आहे. नागरिकांच्या मृत्यूला प्रशासन आणि सत्ताधारीच कारणीभूत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कलाटे यांनी केली.






















Join Our Whatsapp Group