पिंपरी (Pclive7.com):- कौमार्य चाचणीला विरोध केल्यामुळे ऐश्वर्या भाट-तमाईचीकर यांना दांडिया खेळण्यास विरोध केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीतील, भाटनगर येथे आज (मंगळवारी) उघडकीस आला आहे. याप्रकरणी ऐश्वर्या यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी धाव घेतली आहे.
याप्रकरणी मंडळाच्या आठ जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध, प्रतिबंध व निवारण) अधिनियम २०१६ मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण कलम ३ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐश्वर्या विवेक तमाईचीकर यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या या खराडीत राहतात. पिंपरीत माहेरी आल्यानंतर त्या सोमवारी भाटनगरमधील देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दांडिया खेळत असलेल्या महिलांसोबत त्या देखील दांडिया खेळू लागल्या. परंतु, मंडळाने त्या दांडिया खेळत असल्याचे पाहताच दांडिया खेळ बंद करत डीजे सुरु केला. काही वेळानंतर ऐश्वर्या यांनी मैत्रिणीला तिथे बोलाविले आणि त्या पोलीस ठाण्यात गेल्या.
त्यानंतर दांडिया सुरु करण्यात आला. कौमार्य चाचणीला विरोध केल्यानेच दांडिया खेळण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप ऐश्वर्या यांनी केला आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी ऐश्वर्या यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
दरम्यान, जानेवारीपासून ऐश्वर्या आणि भाट समाजातील काही तरुण, तरुणींनी एकत्र येत कौमार्य चाचणी विरोधात आवाज उठविला आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मिडीयावर ‘stop the ‘v’ Ritual’ या नावाने ग्रुप तयार केला आहे.