अजित पवार यांचा एल्गार : आगामी निवडणुकाचे रणशिंग
पिंपरी (Pclive7.com):- सत्तेसाठी राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले उद्या आमची सत्ता आल्यावर कुठून कुठे उड्या मारतील? हे सगळा महाराष्ट्र पाहणार आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच संधी देण्यात येईल. आमच्याकडे जगताप आणि लांडगेंपेक्षा ताकदीचे उमेदवार आहेत, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादीचा सर्वपक्षीय कामगार मेळावा रहाटणी येथे शनिवारी झाला. त्यानिमित्त शहरात आलेल्या अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, नेते नाना काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ता फजल शेख, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, शहरातील नागरी समस्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. भाजपच्या कार्यकाळात सत्ताधारी नगरसेवकांची गुंडगिरी वाढली आहे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलीस आयुक्तालय सुरू केले, त्यामध्येही अनेक समस्या आहेत. पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. कचरा समस्या गंभीर आहे. सत्ताधाऱ्यांना पवना, आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पातील पाणी आरक्षणासाठीचा पुनर्स्थापना खर्च माफ करता आला नाही. या शहरातील विकास प्रकल्पांची गती मंदावली आहे. पिंपरी चिंचवड अगोदर ‘स्मार्ट’ आहे. त्यात आता भाजप काय दिवे लावणार आहे? असा प्रश्नही पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
‘बार्गेनिंग पॉवर’साठी भाजपची रणनिती
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाल्यापासून दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्यास शिवसेना नकारात्मक असल्याचे दाखवित असल्यामुळे ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढविण्यासाठी भाजपकडून शिवसेनेच्या लोकसभा मतदार संघात अटल संमेलन घेतले जात आहे. युतीसाठी भाजपकडून शिवसेनेवर दबाव आणला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत युती करण्यासाठी शिवसेना नकारात्मक पवित्रा घेत आहे. त्यामुळे मावळ आणि शिरूर लोकसभेत शिवसेनेचे खासदार असताना या मतदार संघात भाजपचा मेळावा घेतला जात आहे, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.






















Join Our Whatsapp Group