भोसरी (Pclive7.com):- चिखली येथील घरकुल वसाहत परिसरात पावसाचे पाणी शिरले आहे. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरकुल परिसरसतील इमारतींच्या तळमजल्यावर गुडघाभर पाणी साचल्याने ३ हजार नागरिक अडकून पडले होते. दरम्यान आमदारांच्या निष्क्रियतेचा हा फटका आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी प्रमुख भूमिका बजावणे गरजेचे असताना त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे येथील नागरिक अक्षरश: नरक यातना सहन करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केला आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240724-WA0042-300x300.jpg)
पिंपरी चिंचवड शहरात पावसाने गुरुवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे ठीक ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसाचा सर्वात मोठा फटका पिंपरी चिंचवड मधील चिखली येथील घरकुल प्रकल्पाला बसला आहे. घरकुल प्रकल्प संपूर्णतः पाण्याने वेढला गेला आहे. साधारण तीन हजार नागरिक या प्रकल्पामध्ये वास्तव्याला आहेत. या परिस्थितीची पाहणी शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन सानप, ऋषिकेश जाधव, शैलेश मोरे आदी उपस्थित होते.
याबाबत सुलभा उबाळे म्हणाल्या, घरकुल प्रकल्प आज अक्षरशः पाण्यात बुडाला आहे. स्पाईन रस्त्याच्याकडेला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे. घरकुल परिसराचा सखल भाग असल्याने पावसामुळे सांडपाण्याचे मैलामिश्रित पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून चिखली पेठ क्रमांक १७ आणि १९ येथील घरकुल वसाहतीत शिरते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठ्या व्यासाच्या पाईपलाईनद्वारे या पाण्याचा विसर्ग व्हावा, अशी योजना महापालिकेने करावी, अशी मागणी स्थानिकांनी गेली आठ वर्षापासून केली आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कमी व्यासाच्या ड्रेनेज पाईपलाईन असल्यामुळे दरवर्षी पावसाच्या या तुंबणाऱ्या पाण्यामुळे नागरिक अडकून पडतात. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)
गेल्या दोन वर्षापासून पिंपरी चिंचवड मध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे येथील आमदारांनी पुढाकार घेऊन या प्रश्नाची सोडवणूक करणे गरजेचे असताना त्यांनीही हात वर केले. असेही उबाळे यांनी म्हटले आहे.