पिंपरी (Pclive7.com):- ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यामुळे देशातील एकूण २० राज्यांमध्ये भाजपची सत्ता निर्माण झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने रविवारी (दि.४) रोजी संपूर्ण शहरात रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
आमदार जगताप म्हणाले, “त्रिपुरा, नागालँड, मेघालय या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचा शनिवारी निकाल लागला. त्यामध्ये त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांत भाजपने विजय मिळविला आहे. तसेच मेघालयमध्येही भाजप सत्ता स्थापणार आहे. त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यामुळे भाजपची देशातील एकूण २० राज्यांत आजमितीला सत्ता निर्माण झाली आहे.
पक्षाच्यादृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संपूर्ण शहरात रॅली काढून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. शहरातील भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघातील सहा मंडलांतर्गत ही रॅली काढली जाणार आहे. त्यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघाची पक्षाचे शहर संघटक प्रमोद निसळ, सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पिंपरी विधानसभा मतदारसंघाची सरचिटणीस अमोल थोरात, संजय मंगोडेकर आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची नगरसेवक बाबू नायर व माऊली थोरात यांच्याकडे नेतृत्व देण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागातील पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन मंडलनिहाय रॅली काढून विजयाचा जल्लोष साजरा करतील, असे त्यांनी सांगितले.”