पिंपरी (Pclive7.com):- दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांचा दरारा आहे. आम्हाला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुध्दा रस्ता बदलतात. आम्ही फाटके लोक आहोत.. आम्हाला मंत्रीबित्री काही व्हायचं नाहीये.. अनेकवर्ष दिल्लीत आम्ही असेच फिरतोय फाटक्या सारखे, फकीरा सारखे.. टरकलीच पाहिजे आम्हाला बघून असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
पिंपरीत खासदार श्रीरंग बारणे लिखित ‘आपला वैभवशाली मावळ लोकसभा मतदार संघ’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे, संपर्कप्रमुख बाळा कदम, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, मावळ जिल्हा महिला संघटिका शादान चौधरी, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शिरुरच्या संघटिका सुलभा उबाळे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, अनंत को-हाळे उपस्थित होते.
संजय राऊत म्हणाले की, जो कधी ग्रामपंचायत निवडणूकीत जिंकला नाही अशी मंडळी लाटेत खासदार झालीत. लाटेत वाहून जात मतदारांनी अनेक दुर्जनांना निवडून दिले, त्यामुळे लोकशाहीचे मंदिर आता राहिलेले नाही. सध्याच्या लाटेत वाहून जाणं आता मतदारांनी थांबवलं पाहिजे. गुन्हे दाखल असलेले लोक संसदेत आले त्यामुळे त्या मंदिराचे पावित्र्य उरलेले नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.