पिंपरी (Pclive7.com):- आगामी लोकसभा निवडणुकीत युती झाली तर मावळची जागा भाजपला सोडा अशी मागणी पिंपरी चिंचवडमधील भाजपचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली. महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावतीने गडकरी यांच्याकडे ही मागणी करण्यात आली.
मावळ लोकसभेचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. बारणे यांनी केलेली टिका भाजपा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असूनही शिवसेनेकडून सातत्याने आरोप, टिका होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचे काम करण्याच्या मनस्तिथीत कार्यकर्ते नाहीत. म्हणूनच मावळची उमेदवारी भाजपला सोडावी अशी मागणी एकनाथ पवार यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.