खासदार बारणे यांचा खालापूर तालुका दौरा उत्साहात; ठिकठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका
खालापूर (Pclive7.com):- काँग्रेसच्या पन्नास वर्षाच्या कामाची बरोबरी एनडीए सरकारच्या पाच वर्षात केलेल्या कामाशी होईल, एवढं काम एनडीए सरकारने केले आहे. रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमानाचे जाळे, धरणे, वाहतूक दळणवळण, आधुनिक शेती, असे अनेक प्रकल्प देशभर सुरू आहेत. शेतकरी कर्जमाफी झाली आहे. उरण परिसरातील साडेतीन ते पावणेचार हजार शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली आहेत. पण शेतकरी कामगार पक्षाच्या हातात असलेली जिल्हा बँक शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे. नरेंद्र मोदी यांनी मागील काही वर्षात जगभर प्रवास केला. त्याचे फलित म्हणजे भारतावर हल्ला झाल्यानंतर ते सगळे देश भारताच्या सोबत उभे राहिले. त्यामुळे देशाचे रक्षण करणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख जगात आहे, असे माजी आमदार देवेंद्र साटम म्हणाले.

शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (दि.३) खालापूर तालुक्याचा प्रचार दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ठिकठिकाणी महायुतीच्या घटकपक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या. बैठकीसाठी उरणचे आमदार मनोहर भोईर, माजी आमदार देवेंद्र साटम, रायगड जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे, बाबनदादा पाटील, सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, संपर्क प्रमुख दत्ता दळवी, मंगेश पाटील, नरेश गायकवाड, रेखा ठाकरे, महेश भोईर, उल्हास भोरके, संतोष भोईर, संतोष विचारे, नवीनचंद्र घाटवळ, रेश्मा घोगरे, गोविंद बेलमारे आदी उपस्थित होते.
उंबरे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. सरपंच देवयानी प्रशांत साळुंखे, उपसरपंच दिव्या दिलीप विचारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी भरत पाटील, दिलीप मोरे यांनी राष्ट्रवादी पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षात स्वागत केले.
देवेंद्र साटम म्हणाले, “बारणे यांच्या विजयाचा आवाज नागरिकांमधून आताच येत आहे. देशाला नवीन पर्व देणारी निवडणूक म्हणून लोकसभेच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. त्यावर देशाचे भविष्य अवलंबून असते. देशाच्या समस्या, आव्हाने माहिती असणारा, विकासाचा ध्यास असलेला उमेदवार लोकसभेत निवडून जायला हवा.”
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “मावळ लोकसभा मतदारसंघात काम करत असताना सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं आहे. धनगर आरक्षण मिळण्यासाठी खाजगी विधेयक मांडले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी चर्चा केली आहे. पुढील पंतप्रधान कोण होणार याबाबत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही विचारले असता त्यांच्याकडून ‘नरेंद्र मोदी’ हेच नाव पुढे येते. भ्रष्टाचाराने बरबटलेला राष्ट्रवादी पक्ष आज तुमच्यासमोर मत मागत आहे, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे म्हणत देशाला सक्षम हातात देण्यासाठी महायुतीला मत देण्याचे आवाहन केले.”
महेंद्र थोरवे म्हणाले, “श्रीरंग बारणे यांनी खासदार म्हणून देशाच्या संसदेत काम करताना विकासगंगा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून नागरिकांच्या मनात घर केलं आहे. ही युती सत्तेसाठी नसून सत्यासाठी आहे. खालापूर खोपोली भागातून ४० हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ.”
आमदार मनोहर भोईर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आहेत. त्यांना प्रचंड मताधिक्य देऊन निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत. बारणे यांनी संपूर्ण मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला आहे. त्यांना संपूर्ण कोकण भागातून चांगले मताधिक्य मिळणार आहे.”
दत्ता दळवी म्हणाले, “खासदार बारणे यांनी लोकसभा मतदार संघात सक्रिय काम केले आहे. त्यांच्या कामाची पोचपावती देण्यासाठी त्यांच्या बैठकी आणि सभांना कार्यकर्ते नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. निवडणुकीपूर्वीच विरोधक बावरून गेले आहेत. शिवसेना – भाजप यांचे भांडण वैचारिक होते. त्यामुळे त्याची चिंता विरिधकांनी करू नये. महायुतीच्या माध्यमातून एक सक्षम सरकार देशात आणायचे आहे.”
सावरोली गावात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत बैठक
खालापूर तालुक्यातील सावरोली गावात गावदेवीच्या मंदिरात दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवाद केले. त्यानंतर शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार देवेंद्र साटम, संतोष विचारे, दत्ता दळवी, हनुमंत पिंगळे, बाबनदादा पाटील, नविनचंद्र घाटवळ, रेखा ठाकरे, रेश्माला घोगरे, महेंद्र थोरवे आदी उपस्थित होते. “खासदार बारणे यांना बहुमताने विजयी करावे. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती या माध्यमातून त्यांना नागरिकांनी द्यावी”, असे आवाहन महेंद्र थोरवे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group