पिंपरी (Pclive7.com):- राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात बाजी मारणार कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात चौथ्या टप्प्यातील १७ मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही आज होत आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात थेट लढत होत आहे.
पार्थ पवार हे पवार घराण्यातील उमेदवार असल्यामुळे सर्वच राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले असून पवारांची प्रतिष्ठान पणाला लागली आहे. पक्षाचे राज्यातील अनेक नेते पदाधिकारी तसेच घरातील सदस्यांनी गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात तळ ठोकला होता. पार्थ यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे वडील अजित पवार यांनी सांभाळली होती.
शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सलग दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. भाजपाच्या युतीमुळे अर्थात लक्ष्मण जगताप यांच्याशी झालेल्या मनोमिलनामुळे श्रीरंग बारणे यांचे पारडे जड झाले असून त्यांचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजण्यापूर्वीच मतदारांनी मतदान करिता रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाचा कडाका लक्षात घेता सकाळच्या वेळेतच मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहेत.
मावळ मतदारसंघात एकूण मतदार : २२ लाख २७ हजार १३३, पुरुष मतदार : ११ लाख ६५ हजार ७८८, महिला मतदार : १० लाख ६१ हजार ३१३, इतर मतदार ३२, एकूण मतदान केंद्रे २५०४, मतदान यंत्रे : २५०४, एकूण कर्मचारी : १२ हजार ६५९, संवेदनशिल केंद्र ८३