पिंपरी (Pclive7.com):- अखेर पिंपरी चिंचवड शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सहा मेपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ २९.९३ टक्के पाणीसाठा उरला आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी धरणात ३७.७० टक्के एवढा पाणीसाठा होता.
वाढत्या उन्हाच्या चटक्यांसोबतच आता पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. ६ मे पासून शहरात महापालिकेकडून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. मागील वर्षी परतीच्या पावसाने दिलेल्या ओढीचे कारण महापालिकेकडून देण्यात आले आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे धरणातील पाणी साठ्याच्या पातळीत कमालीची घट होत आहे. त्यामुळेच पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आले आहे.