– संदेश पुजारी –
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरावर अजित पवार यांनी दीर्घकाळ एखाद्या ‘अनभिषिक्त’ सम्राटाप्रमाणे राज्य केले. मात्र मावळ लोकसभा मतदार संघातून त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचा झालेला मानहानीकारक पराभव यातून अजितदादा नावाची ‘जादू’ संपली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पिंपरी चिंचवडकरांनी पुन्हा राष्ट्रवादीला म्हणजेच दस्तुरखुद्द पवार घराण्याला नाकारले आहे.
गेल्या २५ ते ३० वर्षापासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरावर राज्य केले. गेली कित्तेक वर्षे महापालिकेत राष्ट्रवादी निर्विवादपणे सत्तेत होती. अनेक शिलेदारांना पवारांनी आमदार, महापौर, नगरसेवक केले. कित्तेकांना राजकारणात उभे केले. मात्र हे करत असताना ‘जे पेरलं तेच उगवतं’ याचा विसर अजित पवारांना पडला. कारण शहराचा विकास करूनही २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडकरांनी राष्ट्रवादीला सपशेल नाकारले. अजित पवारांच्याच तालमीत तयार झालेल्या लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांनी भाजपचा रस्ता धरत “नको बारामती.. नको भानामतीचा”..! नारा दिला. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून महापालिकेत सत्तेत होती. परंतू त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारून पराभव झाला. १२८ पैकी केवळ ३६ नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडुन आले. तर भाजपाने ८२ चा आकडा गाठला. तो पराभव अजितदादांना चांगलाच जिव्हारी लागला होता. शहराचा विकास करूनही, अनेक नेत्यांना भरभरून पदे देऊनही महापालिकेतील पराभवाचे शल्य त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवले होते. मात्र मोदी लाट असल्यामुळेच सत्तांतर झाल्याची चर्चा होती.
महापालिकेतील पराभवानंतर अजित पवार यांनी पुन्हा पिंपरी चिंचवड शहरावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मावळ लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वत:चे चिरंजीव पार्थ पवार यांना मैदानात उतरले होते. परंतु शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा दोन लाखाहून अधिक मताधिक्क्याने दारुण पराभव केला. या निवडणुकीत पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा पवारांच्या बाबतची नाराजी मतपेटीतून बाहेर पडली. पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना केवळ ६१,९४१ मतांवर समाधान मानावे लागले. तर बारणे यांनी १,०३,२३५ मते मिळवत आघाडी घेतली. तसेच चिंचवड विधानसभेतही राष्ट्रवादीत अनेक दिग्गजांची फौज कार्यरत असताना शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मोठे मताधिक्य घेतले. पार्थ पवार यांना केवळ ७९,७१७ मते मिळाली. तर श्रीरंग बारणे यांनी १,७६,४७५ मते मिळवत मोठी आघाडी घेतली. एकूणच काय पिंपरी मधून ४१,२९४ तर चिंचवड मधून ९६,७५८ असे एकूण १,३८,०५२ एवढे मताधिक्य शिवसेनेला मिळाले.
एकेकाळी पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा ‘शब्द’ प्रमाण मानला जायचा. ‘दादा’ नावाचा आदरपूर्वक ‘दबदबा’ शहरात होता. पवार नावाच्या जादूचे वलय राजकारणाला होते. मात्र २०१७ मध्ये झालेल्या महापालिका आणि आत्ता झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समोर आलेल्या निकालावरून पिंपरी चिंचवड शहरात अजितदादांची ‘जादू’ संपली असचं म्हणावे लागेल.