पिंपरी (Pclive7.com):- महापौर पद हे केवळ शोभेचे बाहुले असून त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकार नाहीत. जर शहरात जर काही समस्या उद्भवली तर सामान्य नागरिक हे महापौरांना जबाबदार धरतात. महापौरांकडून त्यांच्या रास्त मागण्यासंबंधी न्याय मिळण्याची त्यांची भावना असते. मात्र महापौर हे संबंधित अधिकारी वर्गास सुचना देण्याशिवाय काहीही करु शकत नाहीत. अशा प्रकारच्या भावना राज्यातील सर्व महापौरांनी व्यक्त केल्या.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई व महाराष्ट्र महापौर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व्या महापौर परिषदेचे आयोजन लोणावळा येथे नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी राज्यातील विविध १६ महापालिकांचे महापौर उपस्थित होते.
महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते या महापौर परिषदेचे उद्घाटन झाले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर शहराचे महापौर पद भूषविले असल्याने महापौरांच्या समस्यांची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व २७ महानगरपालिकेतील महापौरांना विशेष प्रशासकीय व वित्तीय अधिकार द्यावेत अशी सर्व महापौरांच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव व इतर उपस्थित सर्व महापौरांनी परिषदेत यापूर्वी महापौरांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार मिळण्यासाठी जे विविध ठराव करुन शासनाला पाठविले त्याबाबत काहीच ठोस निर्णय न झाल्याने खंत व्यक्त केली. यापुढील महापौर परिषद ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात येईल. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आमंत्रित केले जाईल असे प्रतिपादन महापौर राहुल जाधव यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या उपाध्यक्षा व नागपूर महापालिकेच्या महापौर नंदा जिचकार, माजी केंद्रीय सचिव जयराज फाटक, व अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण उपस्थित होते.