पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील पीसीएमसी कॉलनी, सेक्टर २२ मधील इमारतींच्या छतांवर डांबर पट्ट्या बसविण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणेच भाटनगरमधील इमारतींच्या छतांवरती देखील डांबर पट्ट्या तात्काळ बसविण्यात याव्यात अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवाराज दाखले यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्यांनी निवेदन दिले आहे.
युवराज दाखलेंनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरीतील भाटनगरमधील सर्व इमारती ह्या जुन्या झाल्या आहेत. अनेक इमारतींच्या छतांमधून पावसाचे पाणी गळण्याच्या घरात शिरले जाते. पावसाळ्यात येथील लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी येते. येथील रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाच्या पाण्यामुळे घरातील संपूर्ण भिंती ओल्या होतात, त्यामुळे लोकांची झोपण्याची सुद्धा गैरसोय होते.
या सर्व बाबींचा महापालिका प्रशासनाने गांभिर्याने विचार करून येथील रहिवाश्यांच्या मागणीनुसार भाटनगरमधील सर्वच इमारतींच्या छतांच्या डांबरीकरणाचे काम करावे. या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास महापालिका प्रशासना विरोधात शिवसेना स्टाईलने जनआंदोलन करण्यात येईल. तसेच याकामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी पालिका आयुक्त आणि प्रशासनाची राहील असा इशारा युवराज दाखले यांनी दिला आहे.