पिंपरी (Pclive7.com):- केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्या जोरावर महापालिकेतही सत्ता मिळवली. परंतू शास्तीकर आणि रेडझोनचा प्रश्न अद्यापही जैसे थे आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होऊनही शहरात प्रचंड गुन्हेगारी वाढलीय. कचऱ्याचा समस्येने त्रस्त होऊन भाजपाचे नगरसेवक आता आंदोलन करत आहेत. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जात होते. परंतू या शहराची ‘वेस्ट सिटी’ ह्या सत्ताधारी भाजपाने केली असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानिमित्त आज अजित पवार शहरात आले होते. त्यापूर्वी सांगवी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, मयूर कलाटे, नाना काटे, पंकज भालेकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, फजल शेख उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्ही खुल्या मनाने मान्य केला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीला मोठ्या ताकतीने सामोरे जाणार आहोत. त्याकरिता काँग्रेस आणि समविचारी पक्षांना सोबत घेणार आहोत. नरेंद मोदींच्या नावावर देशपातळीवर भाजपला बहुमत मिळाले. परंतु त्यांच्या नावाचा वापर करून राज्यात आणि महापालिकेत सत्ता मिळवूनही भाजपला आपल्या कामाचा ठसा उमटवता आला नाही. रेडझोनचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. भाजपाने आता हा प्रश्न सोडवू असे सांगणे बंद करावे. निवडणुका जिंकण्यासाठी नागरिकांना खोटी आश्वासने देऊ नयेत. प्राधिकरणातील साडेबारा टक्क्याचा प्रश्न सुटला म्हणून यांनी जाहिरातबाजी केली. चौकाचौकात फलक लावले. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न अद्यापही सुटला नसल्याची कबुली दिली. स्वच्छ भारतचा गाजावाजा केला, सेलिब्रिटी रस्ते झाडताना दिसले. स्वच्छता करणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र गेल्या एक-दोन वर्षात पिंपरी चिंचवड शहराची काय अवस्था झाली? एकेकाळी ‘बेस्ट सिटी’ म्हणून या शहराची ओळख होती. आता संपूर्ण शहर कचरामय झाले आहे. भाजप नगरसेवकांनाच आता कचरा टाकून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असून बेस्ट सिटीची त्यांनी ‘वेस्ट सिटी’ केली आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय केले म्हणून शिवसेना-भाजपाच्या आमदारांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र पोलीस आयुक्तालय होऊनही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजपच्या नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न होतोय. स्थायी सभापतींना जीवे मारण्याची धमकी दिली जातेयं. कायदा-सुव्यवस्था ढासळत चालली आहे. त्यामुळे परदेशी कंपन्या शहरात थांबायला तयार नाहीत. माथाडीच्या नावाखाली काही संघटना दहशत माजवत आहेत. स्क्रॅप उचलण्यासाठी थेट मंत्रालयातून फोन येत आहेत. भंगार माफिया उदयास येत आहेत. वाहतुकीचा प्रश्न भाजपला सोडवता आला नाही. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयावर दिवसा-ढवळ्या हल्ला होतोयं. विरोधकांना टार्गेट केले जातयं. हे सर्व सुरू असलेले प्रकार लोकशाहीला मारक आहेत, भाजपाकडून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप अजित पवार यांना केला.