मुंबई (Pclive7.com):- भाजपाशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री बनलेल्या अजितदादा पवारांनी अखेर आज (मंगळवारी) त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीशी फारकत घेवुन अजित पवारांनी भाजपाशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. गटनेते पदाच्या निवडीसाठी दिलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्यांच्या पत्राचा वापर सत्तास्थापनेसाठी केला गेला असा आरोप देखील करण्यात आला.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात शनिवारी याचिका दाखल केली. याचिकेवर रविवारी, सोमवारी आणि आज (मंगळवार) सुनावणी झाली. आज सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. सुप्रीम कोर्टानं उद्या (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत भाजपाला बहुमत सिध्द करण्याचाआदेश दिला आहे. त्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला. दरम्यान, अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांकडून करण्यात आले. त्यामध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. अजित पवारांचे मन वळविण्यासाठी शरद पवार, प्रतिभा पवार यांनी देखील प्रयत्न केले. अखेर अजित पवारयांनी राजकीय परिस्थिती ओळखून तसेच कुटूंबाचे महत्व लक्षात घेवुन उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. ही माहिती सूत्रांनी दिली आहे.