पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा शिल्लक असताना देखील शहरावर एक दिवसाआड पाणी कपात लादण्यात आली आहे. सत्ताधारी भाजप आणि महापालिका आयुक्त यांच्यामुळेच शहरातील पाणीपुरवठ्याचा ‘खेळखंडोबा’ झाला असून आयुक्त श्रावण हर्डीकर यांची त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मारुती भापकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवार दि.२५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व महापालिका प्रशासन यांच्या अकार्यक्षम गलथान व भ्रष्ट कारभारामुळेच असा निर्णय झाला असून याचा शारीरिक, मानसिक, आणि आर्थिक त्रास शहरातील करदात्या नागरिकांना बसत आहे. विशेषत: महिलांना या निर्णयाचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी पावसाळा चांगला झालेला असून परतीचा पाऊस देखील मोठा झालेला आहे. पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना केवळ नियोजनाचा अभाव व ढिसाळ अकार्यक्षम, भ्रष्ट कारभारामुळे पाणीपुरवठा विभागाचा खेळखंडोबा झाला असून हा दुर्दैवी निर्णय ठरला आहे.
महापालिकेतील विविध प्रकल्पाच्या निविदा, ठेके, त्यातील रिंग, सल्लागारांच्या नियुक्त्या, थेट पद्धतीने कामे त्यातून टक्केवारीचे भ्रष्ट राजकारण यामध्ये सत्ताधारी भाजपा व प्रशासन मुशगुल असून त्यांना पाणी, आरोग्य, स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर काम करण्यासाठी वेळच नाही. सत्ताधारी भाजपा व प्रशासन केवळ पैसा कमवणे याच कुउद्देशाने काम करत असुन या शहरातील नागरिकांच्या जीविताशी खेळत आहेत. त्यामुळे अशा अकार्यक्षम संवेदनाहीन सत्ताधारी भाजपा व प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. हा निर्णय जनतेच्या विरोधात असून हा निर्णय त्वरित मागे घेण्याचे आदेश व्हावेत. आणि शहरातील पाणीपुरवठ्याचा ‘खेळखंडोबा’ करणाऱ्या आयुक्तांची त्वरित बदली करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.