पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक असताना देखील पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. धरण पूर्ण क्षमतेने भरले असताना सुद्धा दिवसाआड पाणीपुरवठा का? केला जात आहे. असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारला.
शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. प्राधिकरण येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र येथील कार्यालयात झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी उपमहापौर नगरसेवक राजू मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात सध्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. पूर्वी सुरळीत पाणीपुरवठा होत होता. मात्र आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात नियोजनात कुठेतरी अडचण होत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेत सत्ता होती, त्यावेळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात कमी पाणीसाठा असताना देखील शहरवासीयांवर कधीच पाणीकपात लादली गेली नव्हती. मात्र यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले असताना देखील शहरवासीयांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. यात नेमकं नियोजन कुठे चुकतंय? का टँकर लॉबीला पोसण्यासाठी ही कपात केली जात आहे. याबाबत खासदार डॉ. कोल्हे यांनी महापालिका आयुक्त हार्डीकर यांना जाब विचारला. यावर आयुक्तांनी पाणी गळती, आणि वाढलेली लोकसंख्येची आकडेवारी सांगत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी सूचना खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.
One Comment
Monica
Thanks Amol kohale sir for your concern for water really should come daily thanks