पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील भक्तीशक्ती चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि परिसरातील उद्यानात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून त्याकडे महापालिका प्रशासन व ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवशाही व्यापारी संघटनेचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे. यासंदर्भात दाखले यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे.
या निवेदनात युवराज दाखले यांनी म्हटले आहे की, निगडीतील भक्ती शक्ती चौकात सुरू असलेल्या कामामुळे या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरलेले असून चौकातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा व उद्यानात प्रचंड अस्वच्छता झालेली आहे. मात्र या अस्वच्छतेकडे संबंधित ठेकेदार व महापालिका प्रशासन कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे या अस्वच्छतेला कारणीभूत असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष दाखले यांनी केली आहे.