पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य शासन निर्णय ७ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या अटी या अत्यंत जाचक स्वरूपाच्या आहेत, शहरातील बांधकामे नियमित करण्यासाठी मोठा अडथळा त्यामुळे येत आहे. सदरच्या बांधकामाबाबत महापालिका डी. सी. रूल पान क्र. १४८ मधील गावठाणातील व दाट वस्तीबाबत असणारा निर्णय लागू झाल्यास सदर बांधकामे नियमित होण्यास मदत होईल अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच वेळोवेळी शास्ती दराचे नियम बदलण्यापेक्षा केंद्र सरकारने ज्या पद्धतीत दिल्ली येथील अनधिकृत कॉलनीला नाममात्र दर आकारून सरसकट सर्व कॉलनीना जो दिलासा दिलेला आहे. त्या प्रमाणे येथील नागरिकांना दिलासा मिळावा, अशी मागणी या वेळी ज्ञानेश्वर कस्पटे यांनी केली. यावेळी समीर कस्पटे, तानाजी अत्रे, मधुकर कडू, सागर माने आदी या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी आदी नियमातील कलम १८९ अ नुसार अनधिकृत बांधकामांबाबत प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्ती आकारण्याबाबत तरतूद होती. त्याला अनुसरून मनपा सदर बांधकामांना दुप्पट शास्तीकर आकारत आहेत. परंतु बांधकामधारकांनी वेळोवेळी आंदोलन केले. त्यामुळे शासनाने दुप्पट शास्ती बसवण्याएेवजी शासनाकडून वेळोवेळी आदेश दिले. त्यांनी दिलेल्या दराने शास्तीची रक्कम निर्धारणे बाबत २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ५३ अन्वये महाराष्ट्र नगर परिषद , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमात सुधारणा करण्यात आली. परंतु सदर सुधारणा हि केवळ बिल्डर धार्जिणी व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली असल्याचा आरोप कस्पटे यांनी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
कस्पटे म्हणाले कि, दि.२७ सप्टेंबर २०१८ शासन परिपत्रकात नमूद केले आहे की, ६०० चौरसफुट बांधकामांना शास्ती करण्यात येवू नये. ६०० ते १००० चौरस फुटापर्यंत ५० टक्के तर १००१ चौरस फुट पुढील बांधकामांना दुप्पट दराने अशी करण्यात आलेली आहे. तर ८ मार्च २०१९ शासन परिपत्रकानुसार १००० चौरस फुट पर्यंतचे निवासी बांधकाम पूर्णता माफ. १००० ते २००० चौरस फुट पर्यंतचे निवासी बांधकाम ५० टक्के तर २००० चौरस फुट पुढील निवासी बांधकाम दुप्पट दराने अशी करण्यात आलेली आहे. वास्तविक कलम १८९ अ मध्ये दुप्पट इतकी शास्ती आकारण्याची अट होती. परंतु २०१८ मध्ये जी दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये शासन वेळोवेळी दर निश्चित करील त्याप्रमाणे अशी सुधारणा झालेली आहे. सुधारणा झालेल्या परिपत्रकामधे तफावत दिसते असा आरोप कस्पटे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, माझ्या माहिती प्रमाणे १८९ अ मध्ये १० ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या सुधारणेत दुप्पट शास्तीएवजी शासनाच्या दराने आकारण्यात यावी अशी सुधारणा झाली आहे. १००० चौरस फुट पर्यंतचे निवासी बांधकाम पूर्णता माफ. १००० ते २००० चौरस फुट पर्यंतचे निवासी बांधकाम ५० टक्के तर २००० चौरस फुट पुढील निवासी बांधकाम दुप्पट दराने अशी करण्यात आलेली आहे. मग शासन वरील प्रमाणे शास्ती आकारून सर्वसामान्य नागरिकांबद्दल दुजाभाव करताना दिसत आहे. केंद्राप्रमाणे दिलासा नागरिकांना मिळाला तर सर्वसामान्य नागरिकांकडून मिळणाऱ्या मिळकत करापोटी महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. परंतु ७ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या शासन निर्णयामध्ये दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
कारण १८९ अ मध्ये उलेख केल्याप्रमाणे सदरची शास्ती अनधिकृत बांधकाम जो पर्यंत नियमित होत नाही तो पर्यंत आकारण्याची अट आहे. त्यामुळे सदर शास्ती दराविषयी ज्या दुरुस्त्या झाल्यात त्यापेक्षाही जास्त जलद गतीने सदर निर्णयावरती दुरुस्ती आजमितीस पिंपरी चिंचवड शहरात अर्धा गुंठा ते अडीच गुंठा पर्यंत अनेक मोकळे भूखंड आहेत. जे लोकांनी स्वकष्टाने घेतलेले आहे. सदर भूखंडावरती भविष्याच्या दृष्टीकोनातून महानगरपालिकेने सदर गावठाण नियमाप्रमाणे सदर प्लॉट धारकांना दिलासा द्यावा. तसेच शहरात अर्धा गुंठा ते अडीच गुंठा नोंद करून घेणे आवश्यक आहे.
सदर अनधिकृत बांधकाम धारकांनवरती दाखल असणारे गुन्हे मागे घेणेत यावे ज्यामुळे सर्व सामान्य माणसाचे व महानगर पालिकेचे होणारे आर्थिक नुकसान थांबेल. अनियमित बांधकामांना नियमित करण्याचा निर्णय ३१/१२/२०१५ पर्यंतच्या बांधकामांना लागू न राहता सदर शासन निर्णयात दुरुस्ती दिनांकापर्यंत असणाऱ्या बांधकामांना लागू करावा कारण २०१५ पर्यंतची बांधकामे जाचक अटीमुळे नियमित झालेली नाहीत व त्यानंतर झालेली बांधकामे हि केवळ प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे व अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे झालेली आहेत. त्याचे कारण आता महापालिका प्रशासन झोपेतून जागे होऊन सदर झालेल्या बांधकामावरती कारवाई करताना दिसत आहे. परंतु ३१/१२/२०१५ पर्यंत ची बांधकामे देखील सदर निर्णयातील जाचक अटीमुळे अनधिकृतच आहेत. सदर बांधकामावरती कारवाई करण्यापेक्षा सदर निर्णयाच्या दुरुस्ती बाबत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून महापालिका प्रशासनाचे तसेच पोलीस प्रशासनाचे बांधकामावरती कारवाई करण्यासाठी जो खर्च होतोय तो थांबेल.
प्रसारमाध्यमातून सप्टेंबर २०१९ मध्ये दिलेल्या काही बातम्यांनुसार महापालिकेने कचरा गोळा करण्यासाठी ६० रुपये प्रतीघर जमा करून ४० कोटीं पर्यंत महानगरपालिकेला वार्षिक उत्पन्न मिळणार आहे अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्याबद्दल दुमत नाही परंतु काल परवा काही प्रसारमाध्यमांमध्ये ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मिळकत कर माफ करण्यासंदर्भात प्रस्ताव आला तर राज्यशासनाकडे पाठवून त्यानंतर राज्यशासनाच्या आदेशानुसार कारवाई करण्याबाबत प्रशासन विचाराधीन आहे असे समजले. परंतु महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा मिळकत करावर असून, जर असा निर्णय घेतला गेला तर महानगरपालिकेला आर्थिक दृष्ट्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल व त्याचा परिणाम महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांवर होईल व तो निर्णय शहराच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून योग्य ठरणार नसल्याचे प्रतिपादन कस्पटे यांनी केले.