मुंबई (Pclive7.com):- राज्यातील वाढत्या कोरोना संक्रमितांच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सध्या लॉकडाउनची चौथी फेज सुरू आहे, यात भारतीय जना पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 22 मे रोजी भाजपकडून ‘मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव’ अशा प्रकारचे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसंच हातावर पोट असणाऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे. याच पार्श्वभूमिवर भाजपकडून करण्यात येणाऱ्या या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेने आपल्या घराबाहेर येऊन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत काळे मास्क, काळे शर्ट, काळी रीबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा, असे आवाहन चंद्रकांत पाटलांनी केले आहे.
आंदोलनाबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, ’22 तारखेला मेरा अंगण मेरा रणागंण महाराष्ट्र बचाव अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रातील जनतेने आपल्या घरासमोर सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून राज्य सरकारचा निषेध करावा. यावेळी निषेध व्यक्त करण्यासाठी काळे बोर्ड, काळे टी शर्ट, काळी रीबीन, काळे मास्क, काळे शर्ट, काळ्या ओढण्या अशा गोष्टींचा वापर करावा.’
केरळसोबत महाराष्ट्राची तुलना
यावेळी चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्राची केरळसोबत तुलना केली. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण 9 मार्चला सापडला होता, त्याच दिवशी केरळमध्येही पहिला रुग्ण सापडला. केरळाची संख्या 70 दिवसात 1 हजार पार झाली तर महाराष्ट्राची 70 दिवसाची संख्या ही 40 हजारांच्या जवळ गेली. केरळमध्ये मृतांची संख्या 12 पार झालेली नाही. पण महाराष्ट्रातली मृत्यूची संख्या 1300 पार होऊन 1400 कडे निघाली आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे उदाहरण आहे.’























Join Our Whatsapp Group