पिंपरी (Pclive7.com):- अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी. टाळाटाळ करू नये. शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देवू नका, अशा कडक सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येवू देऊ नका, असेही त्यांनी सुनावले.
अतिवृष्टीमुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील अनेक भागातील शेतीचे नुकसान झाले आहे. खासदार बारणे पूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत.
खासदार बारणे यांनी गुरुवारी कर्जत तालुक्यांतील कडाव, माणीवली, सुगवे, कोल्हारे, बीरदोले या गावातील नुकसान झालेल्या भात पिकाची पाहणी केली. प्रांतआधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, गट विकास आधिकारी बालाजी पुरी, कृषि आधिकारी बाळासाहेब लांडगे, कर्जत पंचायत समिती सभापती सुजाता मनवे, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, शिवसेना उपतालुका प्रमुख बाबू घारे, सुदाम पवाळी,माजी नगरसेवक संतोष पाटील,भारत डोंगरे, दिनेश भोईर, नेरळ शहर प्रमुख रोहीदास मोरे, योगेश दाभाडे, सरपंच राजु शिंगवा, नगरसेवक विवेक दांडेकर, प्राची देवनकर, संपत हडप, प्रथमेश मोरे उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून विमा काढला जातो. याची 90 टक्के रक्कम केंद्र सरकार तर 10 टक्के रक्कम शेतकरी भरतो. परंतु, काही विमा कंपन्या झालेल्या नुकसानीची भरपाई देत नाहीत. टाळाटाळ करतात. शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात. अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यांनतर तत्काळ संबंधित विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येवू देऊ नका, असे निर्देश दिले आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ, कर्जत, खालापूर या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर भात शेती होते. अतिवृष्टीमुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आजसुद्धा शेतात पाणी साचलेले आहे. पाऊस दररोज पडत आहे. पाणी साचल्याने शेतकऱ्यांना पुढची पिके घेता येणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डबल नुकसान होण्याची चिन्हे आहेत, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.
बांधावर जावून खासदार बारणे देताहेत शेतकऱ्यांना दिलासा..!
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल आहे. या परिस्थितीत खासदार बारणे स्वतः सर्वत्र फिरून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांना धीर देत आहेत. संपूर्ण मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौरा त्यांनी पूर्ण केला आहे.
राज्य सरकारच्या वतीने नुकसान भरपाई देण्याबाबत दोन दिवसांत घोषणा करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्याच अनुषंगाने खासदार बारणे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत. सर्वाधिक लोकसंपर्क असलेले, लोकांची व्यथा जाणून घेऊन न्याय देण्याची भूमिका घेणारा लोकप्रतिनिधी म्हणून खासदार बारणे यांची ओळख आहे. कोणत्याही संकट काळात खासदार बारणे सर्वांत अगोदर नागरिकांपर्यंत पोहचतात.






















Join Our Whatsapp Group