पिंपरी (Pclive7.com):- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन ७ फेब्रुवारीला चिंचवडमध्ये प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर करणार आहेत. अशी माहिती स्वागत समितीचे सचिव ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी दिली.
अभिवपच्या स्थापनेनंतर पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन’ होत आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘राष्ट्रीय शिक्षा नीती’ हे या अधिवेशनाचे प्रमुख विषय आहेत.
अधिवेशनाच्या स्वागत समिती अध्यक्षपदी मराठा काॅमर्स ऑफ चेंबर्सचे अध्यक्ष सुधीर मेहेता असतील तर, बालाजी शैक्षणिक संस्थेचे संचालक परम बालसुब्रमन्यम् हे उपाध्यक्ष तसेच ॲड. मोरेश्वर शेडगे हे सचिव असतील. महापौर उषा ढोरे यांच्यासह समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती स्वागत समितीचे सदस्य असतील. यात स्वागत समिती संरक्षक गिरीश प्रभुणे तर, व्यवस्था प्रमुख कृष्णा भंडलकर असतील.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ही गेली ७२ वर्ष शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असलेले जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. विद्यार्थी हा उद्याचा नाही आजचा नागरिक आहे. संघटन बंधनातून राष्ट्रहितासाठी झटणारे विद्यार्थी घडवणे हे ध्येय ठेवून अभाविप गेली ७२ वर्ष कार्यरत आहे. विविध कार्यक्रम, एकत्रीकरण, अभ्यास वर्ग, आंदोलने, अधिवेशन यातून हे साध्य होत असते.
पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या शहरात श्रमिक वर्ग आणि उद्योजक वर्ग मोठा आहे. येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी वर्ग सदैव देशप्रेम आणि एकतेच्या अखंड धारेतून बाहेर पडू नये, विद्यार्थ्यांचा उत्कर्ष व्हावा, त्यांनी समाजात पत प्रतिष्ठा मिळवावी; मात्र योग्य वेळी देशासाठी एकत्र यायला, ज्ञानार्जनासाठी त्यांनी सदैव तत्पर राहावे, त्यांनी चारित्र्य (शील) घडवावे आणि राष्ट्र ऐक्यात सामील व्हावे. यासाठी अभाविप आग्रही भूमिकेत आहे. त्या दृष्टिकोनातून येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन हे अभाविप पिंपरी चिंचवड करत आली आहे. महापुरुषांच्या जयंती निमित्त एकत्रीकरण प्रबोधन, विविध चर्चासत्रांचे आयोजन, लेखन स्पर्धा या पिंपरी चिंचवड अभाविप तर्फे होत असतात.
‘उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड शहराची आता शैक्षणिक नगरी म्हणून नविन ओळख होऊ पहात आहे त्यामुळे अभाविपचे प्रदेश अधिवेशन विद्यार्थी जडणघडणीत मोलाचे ठरेल अशी माहिती स्वागत समितीचे सचिव ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी दिली.