पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपलं भाषण आणि कवितांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोलाचा सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि ‘हम दो हमारे दो’ याची अंमलबजावणी करावी, असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिला आहे पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या हम दो हमारे दो धोरणावरून टीका केली होती. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी. काँग्रेसनेही जाहीरनाम्यात शेतकरी कायद्याचे वचन दिले होते, याची आठवण आठवले यांनी करून दिली. शेतकरी आंदोलनावर बोलताना आठवले यांनी दिल्लीमधील शेतकरी हे आंदोलनाला वाढवत असल्याची टीका त्यांनी केलीय. सरकार चर्चेला तयार आहे, पण कायदेच मागे घ्या, ही शेतकऱ्यांची भूमिका असंवैधानिक असल्याची टीका त्यांनी केली.
२०० शेतकऱ्यांच्या मृत्यूला अप्रत्यक्ष शेतकरी जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. तिरंग्याचा अपमान दुर्दैवी आहे. शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा काही सहभाग नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान पुण्यात आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण यांच्या मृत्यूला कोणी जबाबदार असेल तर त्याची चौकशी करावी, असंही आठवले म्हणाले.
मराठा आरक्षणाला आरपीआयचा संपूर्ण पाठिंबा आहे. मात्र त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. मराठा आरक्षण ओबीसीमध्ये टाकून वाद निर्माण करू नये. २०२१ ची जनगणना जातीच्या आधारावर करावी ही पंतप्रधानकडे मागणी केलीय. त्यामुळे जातीनिहाय आकडेवारी कळायला मदत होईल, असंही रामदास आठवले म्हणालेत.