पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहातील हिंजवडी, पुनावळे, ताथवडे, वाकड परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजित कुलथे यांनी महावितरणला निवेदन दिले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी, पुनावळे, ताथवडे, वाकड या परिसरात मोठ्या प्रमाणात आयटी वर्गातील कामगार नागरिक राहतात. सध्या लाॅकडाऊन असल्याने सर्वांना ‘वर्क फ्राॅम होम’ करावे लागत आहे. त्यामुळे सर्वांना सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन काम करावे लागते. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. वीज पुरवठा खंडित झाला तर काम करणे शक्य होत नाही आणि नाईलाजाने अर्धा दिवसाची किंवा संपूर्ण दिवसाची सुट्टी घ्यावी लागते. अश्या परिस्थितीत अनेकांना आर्थिकदृष्ट्या नुकसान सहन करावे लागत आहे.
तसेच जून महिन्यात शाळा पण चालू होतील. सध्याच्या परिस्थितीत अजून किमान तिन-चार महिने शाळा ऑनलाईन पद्धतीनेच चालू राहतील, अश्यात जर वीज पुरवठा खंडित झाला तर विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक नुकसान सहन करावे लागु शकते. या कोरोना वैश्विक महामारी संकट काळात हे सर्व न परवडणारे आहे. तरी वीज पुरवठा खंडित होऊ नये, नागरिकांना होणारा नाहक त्रास त्वरित थांबबावा अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजित कुलथे, बालाजी पाटील, निलेश रोकडे उपस्थितीत होते.