✒️ – किशोर काशिनाथ हातागळे
पिंपरी (Pclive7.com):- कोरोनासारख्या महामारीने जगभर थैमान घातले असतानाही अजुनही आमचं डोकं ठिकाणावर नाही, कोरोनाच्या लाटापेक्षा राजकारण्यांच्या लाटांनीच जनता परेशान आहे, सत्तेसाठी आम्ही आज काहीही करतोय, कुठल्याही टोकाला जातोय, नागरिकांच्या जिवापेक्षा आम्हाला आता “सत्तेच्या खुर्च्याच” जास्त महत्वाच्या वाटतात, त्याच-त्या बातम्या बघण्याचा खरचं आता कंटाळा आलाय, रोज एकमेकांवर चाललेली चिखलफेक आणि एकेरी आरोप बघुन खरचं वाटतं, हे बाप्पा जाता जाता थोडी बुद्धी आम्हाला देऊन जा…!
हे बाप्पा जाता जाता आम्हाला खरचं थोडी बुद्धी देऊन जा, बलात्काराच्या घटना आता तर रोजच घडत आहे, रोजच अल्पवयीन मुली कडाकडा फोडून खाल्ल्या जात आहेत, कोवळ्या मनाचे आणि तान्हुल्या तनाचे “हे वासनेचे शिकारी” लचके तोडत आहेत. सामुहिक बलात्कार करण्याची व नंतर खुन करण्याची नवीनच प्रथा रूढ होत चाललीय पण याच्यात फक्त “त्या” पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबियानांच तोंड द्यावं आणि लपवावं लागतयं. बलात्कारी मात्र उधळ माथ्याने फिरतच असतो, प्रशासन तरी कुठं राहिलय आता गरीबांच्या बाजुने, पैशाची पट्टी डोळ्यावर बांधली की सर्व संवेदना जाग्यावर मारल्या जातात.न्यायाच्या भुमिकेत असणाऱ्या पिडीतेला न्याय मिळतच नाही, आणि तुरुंगात जाणारा आरोपी पुराव्याअभावी व साक्षीदाराविना “निर्दोष” सोडला जातो. आरोपीला सर्व स्तरातुन मदत मिळते, त्यात मग राजकारणी, पोलीस यंत्रणा, वकील, साक्षीदार अशी सर्व साखळी आरोपींच्या मागे “आर्थिक” देवाणघेवाणीतुन उभी राहते.
पिडीत कुटुंबाला आपली राहिलेली थोडीसी अब्रू घेऊन गाव सोडून जाण्याची वेळ येते किंवा मेणबत्या घेऊन मोर्चे आंदोलने करून न्यायाच्या प्रतिक्षेत घालवावी लागते. आम्ही नेते पुढारी आणि विविध संघटना, घसा ताणुन आपल्या पक्षाच्या बॅनरखाली मोठमोठे आंदोलने करतो, पंधरा मिनिटांसाठी आम्ही डोळ्यात पाणी साठवूण निरासगतेने भाषणं ठोकतो. पोजमध्ये फोटो काढून शेवटी फक्त बातमीच करतो. नंतर आम्हाला कुणाचं सोयरसुतक? संवेदना संपत चाललेलो आम्ही.. आम्हाला खरचं कधी दुसऱ्याच्या भावना जाणवतील का? दुसऱ्याचं दुःख आपल्या मनाला कधी भेदून जाईल का? तेव्हा खरचं वाटतं, हे बाप्पा जाता जाता आम्हाला थोडी बुद्धी देऊन जा..!
हे बाप्पा जाता जाता आम्हाला थोडी बुद्धी देऊन जा, थोडं निसर्गावर व मुक्या प्राण्यांवर प्रेम करायला शिकवुन जा.. तहानलेल्या आणि भुकेलेल्याना दोन घास भरवण्याची मनात तळमळ देऊन जा.. वाडवडिलांचा मान-पान राखायला शिकवुन जा.. सर्वांच्या मनातील राग द्वेष आणि सूडबुद्धीची भावना कायमच्या सोबतच घेऊन जा.. शिक्षकांना विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याची बुद्धी देऊन जा.. डॉक्टरांना लोक देव मानतात पण हेच “मानवी देव” आता लाखोचे बिलं लुटताना कसलाच विचार करत नाहीत. पतीच्या आरोग्यासाठी कधी “मंगळसूत्र” गहाण ठेवणारी तर कधी व्याजाच्या पैशासाठी लोकांसमोर हात पसारणाऱ्या त्या माऊलीची थोडीशीही कदर नसलेल्या त्या व्यावसायिक डॉक्टरला थोडीतरी माणुसकी देऊन जा…!
पण ऐक ना बाप्पा, तु कसा आहेस बरा आहेस ना? दोन वर्षे झाली तु येतोस पण कोरोनाच्या नियमामुळे तुझा पाहिजे तसा पाहुणचार आम्हाला करताच येत नाही. राजकीय मंडळींना निवडणुकीसाठी परवानग्याची गरज लागत नाही. पण गणेशोत्सव, दिवाळी दसरा, नवरात्र, गुढीपाडवा यासाठी मात्र खुप बंधन असतात. सणासुदीला कोरोना खुप वाढतो असं प्रशासन आणि सत्ताधारी म्हणतात पण तू एवढं मनावर नको घेऊ..!
आम्हाला अजुनही कळत नाही, हे कोरोनासारखे आजार येण्याचं कारण काय? माहीत आहे, जगात पाप खुप वाढलय, निसर्ग आणि प्राणीमात्राचा ऱ्हास होत चाललायं. पण इतकं असुनही तुम्ही शांत का? देवापेक्षा भुतावर जास्त विश्वास ठेवणारी ही भुताटकी माणसं.. खुपच कठोर आणि निष्ठुर मनाची झालीत. माणसाच्या माणुसकीची घडी इतकी बिघडली की प्रत्येकजण स्वतःचा विचार करतोय. ना निसर्गाचा विचार, ना वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण, ना लुटीवर आळा, ना भ्रष्टाचारावर कुणाचं बंधन, धडाधड माणसं मारली जातात. लुटली जातात, फसवली जातात.
माणसं इतकी बदलली आणि तू नाही बदलून कसं चालणार? जेव्हा-जेव्हा असत्त्याची बाजु डोईजड होते, तेव्हा-तेव्हा निसर्ग कुठल्या ना कुठल्या रुपात येतो आणि कोप पावतो. पण बाप्पा दोन वर्षे झालीत, तुमचं दर्शन घेताना व विसर्जन करताना तुमच्या भक्तांना पण खुप अडचणी आल्यात. निदान पुढच्या वर्षी तरी हे सर्व सुरळीत होऊ द्या.. घ्या आता सर्व गोड मानुन आणि हे संकट दुर करा. पैशाला सर्वस्व मानणारे कित्येक व्यापारी-उद्योजक आता गुडग्यावर आलेत. गरिबांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. नालायकांना चांगला धडा मिळाला असेलही पण कित्येक निष्पाप गरिबांना याचा त्रास होतोय. आम्हाला पहिल्यासारख आनंदाचं वातावरण पुन्हा द्या, मनमोकळा श्वास आणि गर्दीचा त्रास पुन्हा द्या, सणाला व लग्नकार्याला ना कुठली बंधन ना कुठलं संकट, निर्विघ्नपणे तुमच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या कार्याचा “श्रीगणेशा”.
पण आता खरचं सर्वांना सद्बुद्धी आणि चांगले विचार मिळण्याची गरज आहे.. म्हणुन बाप्पा जाता जाता खरचं आम्हाला थोडी बुद्धी देऊन जा..!