पिंपरी (Pclive7.com):- उत्तरप्रदेश येथे नुकतेच झालेल्या आंदोलक शेतक-यांना गाडीने उडवून भाजपाच्या मंत्री पुत्राने हत्या केल्याच्या निषेधार्थ व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याशी उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेल्या बेजाबदार वर्तनाविरोधात आज पिंपरी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोडेमारो आंदोलन केले.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात इंटक, युवक काँग्रेस, सेवादल व एन एस यु आय, या काँग्रेस पक्षाच्या आघाडी संघटनांनी भाग घेतला. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार व केंद्रीतील मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना डॉ. कैलास कदम म्हणाले, “देशात मोदी सरकार लागू झाले तेव्हापासूनच नागरिकांवर विशेषतः शेतकरी व कामगार हे दोन घटक आपल्या देशात अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो आहे. व त्यात आता भर म्हणून की काय या भाजपाच्या मंत्र्याच्या मुलाने उत्तरप्रदेश मधील आंदोलक शेतक-यांना मोटारीने चिरडले. त्यात सहा शेतक-यांना मृत्यू झाला. आधी न्याय द्यायचा नाही, अन्याय करायचा, त्यात आंदोलन केले कि असे चिरडायचे यावरून मोदी व योगी यांचा व भाजपाचा खरा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे.
याच प्रकरणात त्या शेतकरी आंदोलकांना भेटण्यास जात असलेल्या प्रियांका गांधी यांना बेजाबदारपणे अडवले गेले. यावेळी एका महिलेशी वागण्याचे निकष पाळले गेले नाही हि बाब अत्यंत खेदजनक व संतापजनक आहे. अशा कृत्याने योगी सरकार हे प्रियांकाजींना घाबरत असल्याचे दिसून येते. या प्रकरणास जबाबदार असलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्वरित राजीनामा द्यावा” असे कदम म्हणाले.
निषेध नोंदवताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “एका बाजूने युवकांवर बेरोजगारीने मरण्याची वेळ आली आहे. व दुस-या बाजूला हे असे शेतकरी आंदोलक वाहनांनी चिरडले जात असतील तर यापेक्षा दुर्दैवी व सरकारी तानाशाहीचा काळ यापुर्वी कधीही या देशाने पाहीला नाही. प्रियांकाजींना बेकायदेशीरपणे अडवून उत्तरप्रदेश पोलिसांनी स्वतः कायद्याचा भंग केला आहे व ज्या प्रमाणे प्रियांका गांधी ज्या या देशाच्या नेत्या आहेत, यांच्याशी पोलिस वागले ते निश्चितच चीड आणणारे आहे व यालाच सत्तेचा गैर वापर व सत्तेची मस्ती म्हणतात. परंतु देशाचा इतिहास आहे कि हे असे हुकूमशाह जनतेने उलथवून लावले आहेत. व आता तशीच वेळ या भाजपाच्या मोदी व योगी सरकारवही आल्याशिवाय राहणार नाही”.
या प्रसंगी सुरूवातीला या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलक शेतकरी बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी अशोक मोरे, विश्वास गजरमल, उमेश खंदारे, वसीम ईनामदार, सलमान जब्बारअली यांनी ही निषेध व्यक्त केले.
या निषेध आंदोलनास पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष ॲड उमेश खंदारे, एन एस यु आय चे शहराध्यक्ष डॉ. वसीम ईनामदार, उत्तरप्रदेश काँग्रेस सेवादलाचे महासचिव सलमान जब्बारअली, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, शहर एस सी विभागाचे कार्याध्यक्ष विजय ओव्हाळ, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष गणेश नांगरे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस रवी नांगरे, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी युवक अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अलोक लाड, विशाल सरवदे, अनिल सोनकांबळे, प्रकाश पठारे , सचिन कदम, रहीम चौधरी आदि पदाधिकारी सहभागी झाले.