बारामती (Pclive7.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्याची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली.
त्याचा संताप किंवा राग सत्ताधाऱ्यांना आला असावा, आजची कारवाई ही त्यावरील प्रतिक्रीया असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी छापेमारीबाबत नाराजी व्यक्त केली. ते बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, एखाद्या विषयासंबंधी शंका असल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार यंत्रणांना आहे. मात्र, अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे. अधिकाराचा असा गैरवापर किती दिवस सहन करायचा याचा आता लोकांनीच विचार करावा, असेही त्यांनी म्हटले.
साक्षीदार हे एखादी घटना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, त्यासंबंधी न्यायालयात साक्ष देण्यासाठी बोलावले जातात. कारवाई वेळी पकडणे हे साक्षीदारांचे काम नाही. मुंबई ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना घेऊन जाणारे लोक शासकिय यंत्रणेचे नव्हते. नंतर खुलासा करण्यात आला की ते साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते. याचा अर्थ कारवाईत काही पक्षीय लोकांना सामावून घेण्यात आले होते.
ड्रग्स कारवाई झालीच पाहिजे, पण ती या पद्धतीने नको, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.